लोकसत्ता टीम नागपूर: भरधाव ट्रक घेऊन जात असताना चालकाला डुलकी आली आणि ट्रक थेट उड्डाणपुलावरून खाली एका घरावर आदळला. घरातील सदस्य थोडक्यात वाचले. परंतु, ट्रक चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजता धामना येथे घडला. हर्षल युवराज पाटिल (३५, रा. तामसवाडी, ता. साखरी, जि.धुळे) असे मृत चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक हर्षल पाटील हा ट्रकमध्ये मिरचीची पोते घेऊन नागपूरवरुन जळगावला भरधाव जात होता. धामना उड्डाणपुलावरून जात असताना चालकाला अचानक एक डुलकी आली. त्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. उड्डाणपुलावरील रोडला लागलेल्या लोखंडी सळाखीला ट्रक घासला आणि थेट पुलाच्या खाली एका कवेलूच्या घरावर आदळला. यात ट्रकमधील वाहन चालक हर्षल पाटील हा जागीच ठार झाला. आणखी वाचा- लग्नास नकार दिल्याने प्रियकराची आत्महत्या, प्रेयसीने घराला कुलूप लावून कुटुंबासह काढला पळ ज्या घरात ट्रक आदळला. त्यावेळी त्या घरात रमेश महादेव कोल्हे, लिलाबाई महादेव कोल्हे, जितेंद्र राजेंद्र कोल्हे, वैशाली जितेंद्र कोल्हे, वच्छला महादेव कोल्हे (सर्व राहणार धामना) व बहिणीकडे पाहुणी आलेली जयश्री शिंदे (साकोली) हे सहा व्यक्ती गाढ झोपेत होते. अचानक जोराचा आवाज आल्याने सर्व व्यक्ती उठले. तेथे गोंधळ उडाला. रमेश कोल्हे यांनी हिंगणा पोलीसांना फोनवर माहिती दिली. पोलीस तासाभरातच घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत रमेश कोल्हे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.