राजेश्वर ठाकरे
नागपूर : साधारण तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास भाडे (ईएफटी) घेऊन प्रवासास मुभा दिली जात असल्याने आरक्षणधारक प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘ईएफटी’ही ‘वसुली’ असून त्यामुळे आरक्षणधारकांना त्रास सोसावा लागत असल्याची तक्रार आहे.

रेल्वेत दोन पद्धतीने ‘ईएफटी’चा उपयोग केला जातो. डब्यात जागा उपलब्ध असल्यास शुल्क आकारून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. तसेच साधारण (करन्ट) श्रेणीचा तिकीटधारक आरक्षित डब्यात आढळल्यास त्याच्याकडून दंड वसूल करून प्रवास करू दिला जातो. अशाप्रकारे अनारक्षित तिकीटधारकांकडून दंड घेऊन जागा नसतानाही आरक्षित डब्यातून प्रवास करू देण्याचे प्रकार अनेक पटींनी वाढले आहेत. त्यामुळे आरक्षणधारकांना हक्काची जागा मिळवणेही कठीण होते. अलीकडेच नागपूरमध्ये संघमित्रा एक्सप्रेसमध्ये ‘ईएफटी’धारकांनी गर्दी केल्यामुळे एका महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला आरक्षित तिकीट असूनही गाडीत प्रवेश करता आला नाही. त्यांना रेल्वेस्थानकावर तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा दल यांनी कोणतीही मदत केली नाही. याबाबतची तक्रार भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वे मंडळाकडे केली. त्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ईएफटी वितरित करणे तात्पुरते थांबवले आहे. मात्र, इतर विभागांत सर्वत्र ईएफटी वितरण सर्रास सुरू आहे. ही पद्धत बंद होत नाही तोपर्यंत प्रवाशांना दिलासा मिळणे अशक्य असल्याचे मत शुक्ला यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>>मतटक्क्याला झळा! विदर्भात दुसऱ्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान

 वातानुकूलित डबे वाढवण्याच्या रेल्वेच्या धोरणानुसार शयनयान श्रेणीचे डबे टप्प्याटप्प्याने कमी करून वातानुकूलित डबे वाढवण्यात येत आहेत. देशात सध्या १३ हजार मेल आणि एक्स्प्रेस धावतात. सध्या बहुसंख्य गाडय़ा २४ डब्यांच्या आहेत. त्यातील शयनयान डब्यांची संख्या ११ वरून ७ वर आणण्यात आली आहे.

साधारण तिकिटावर आरक्षित डब्यात घुसलेल्या प्रवाशांकडून अतिरिक्त प्रवास भाडे वसूल करून रेल्वे प्रशासन आरक्षणधारकांची गैरसोय करीत आहे. 

मध्य रेल्वेत ७०० मेल, एक्स्प्रेस

मध्य रेल्वे मार्गावर एकूण ७०० मेल आणि एक्स्प्रेस धावतात. मेल आणि एक्स्प्रेससाठी सुमारे अडीच हजार डबे वापरात आहेत. यामध्ये एक हजार वातानुकूलित, ९०० शयनयान आणि ६०० सामान्य डबे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शयनयान, सर्वसाधारण डब्यांमध्ये विशेष पथक तैनात केले आहे. गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त गाडय़ा सुरू केल्या आहेत. डब्यांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ईएफटी देणे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. – मनीष मित्तल, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे