अमरावती: आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असल्याचे सांगितले जाते. पण गावात राहणाऱ्या लोकांना अजूनही हक्काचे घर मिळाले नाही. शेतमालाला भाव मिळत नाही. रोजगार हमी योजनेत २०१७ मध्ये २०० रुपये प्रतिदिन मजुरी मिळत होती, २०२५ मध्ये फक्त १०० रुपये वाढले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पगार २०१० मध्ये ५५ हजार होता. आता त्‍यांचे मानधन अडीच लाख रुपये झाले आहे.

प्रश्न यावर विचारले गेले पाहिजेत. याची लाज वाटली पाहिजे, पण त्याकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे केली.

प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, अजित पवार आणि इतर मंत्र्यांना अडीच लाख रुपये पगार मिळतो आणि सहाशे रुपये दरमहा दिव्यांगाला मिळत होते, ते केवळ पंधराशे रुपयांपर्यंत वाढवले जातात. याची लाज वाटली पाहिजे. पण, प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्याला देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. दिव्यांगांचा उदरनिर्वाह पंधराशे रुपयांत कसा चालत असेल, हा प्रश्न आम्हाला पडत नाही. सर्व राजकीय पक्षांनी आपल्याला जात-धर्मात गुंतवून ठेवले आहे.

बच्चू कडू म्हणाले, ‘गिरता वही है जो रुकता है, बच्चू कडू रुकनेवाली चीज नही, वो दौडनेवाली है’, त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे रडगाणे गात राहणे, उपयोगाचे नाही. किती दिवस हा विषय डोक्यात ठेवायचा. आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जातील, ज्यांनी मतांची चोरी केली, ज्यांनी मतांवर दरोडा टाकला, त्यांना आडवे करण्याची खुणगाठ आता बांधली पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या माध्यमातून मतांची चोरी करणाऱ्या लोकांना आता धडा शिकवला पाहिजे. भारतात वेगळे वातावरण तयार केले जात आहे. संविधानाची चिरफाड केली जात आहे. जाती-धर्माच्या नावावर संपूर्ण देश हा खऱ्या लढाईपासून दूर केला जात आहे. काल परवा आम्ही यवतमाळला गेलो होतो. तेथे एक घटना कळली. एका बारा वर्षांच्या मुलीला घराजवळील हातपंप दूरूस्त होत नाही, म्हणून तिला पाण्यासाठी नदीवर जावे लागते आणि नदीत बुडून मृत्यू होतो, अशी अवस्था आहे.