अकोला : अकोला जिल्ह्याच्या पातूर येथील शिवभक्तांवर मध्य प्रदेशमध्ये काळाने घाला घातला. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून पवित्र गंगाजल घेऊन परतणाऱ्या कावड यात्रेमध्ये रेतीचा अनियंत्रित ट्रक शिरला. या ट्रकची धडक लागल्याने कावड यात्रेतील ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. त्याखाली दबून दोन शिवभक्तांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील सिवनी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त केले जात असून शोककळा पसरली आहे.
श्रावण महिना सुरू असल्याने देशभरात विविध ठिकाणी कावड यात्रा काढली जाते. कावड यात्रा काढण्याची मोठी परंपरा आहे. यामध्ये पवित्र जलाने जलाभिषेक केला जातो. दरम्यान, कावड यात्रेतून पवित्र गंगा नदीचे जल घेऊन येणाऱ्या जिल्ह्यातील शिवभक्तांचा मध्यप्रदेशमध्ये मोठा अपघात झाला. जिल्ह्यातील पातूर येथील जय तपे हनुमान व्यायाम शाळेच्यावतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. काशी विश्वनाथ येथून गंगाजल घेऊन ही कावड यात्रा परतीच्या मार्गावर असताना दुर्दैवी घटना घडली.
मध्य प्रदेशमधील सिवनी येथे कावडधारी शिवभक्तांनी रात्रीचे जेवण घेतले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून ते महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. यावेळी मागून येणाऱ्या रेतीचा अनियंत्रित ट्रक कावड यात्रेमध्ये शिरला. या ट्रकने कावड यात्रेतील ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टर व ट्रॉली अनियंत्रित होऊन कावडधाऱ्यांच्या अंगावर कोसळली. त्यामुळे त्याखाली दबून दोन कावडधारी शिवभक्तांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले आहेत. बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश पोहरे अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी जखमींना उपचारार्थ तत्काळ स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. जखमींपैकी देखील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. मध्य प्रदेश पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून ट्रकचालकाचा शोध घेतला जात आहे. धार्मिक प्रथेनुसार काढलेल्या कावड यात्रेतील शिवभक्तांवर काळाने झडप घातल्याने अकोला जिल्ह्यातील पातूर येथे शोक व्यक्त केला जात आहे