अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सत्तेसाठी भाजपमध्ये फूट पडली. भाजपच्या दोन मतांच्या मदतीने वंचितने चारही पदांवर विजय मिळवला. भाजपची तीन मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली. देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फूट पडल्याने पक्षासाठी धक्का मानला जात आहे.न्यायालयाच्या आदेशामुळे सभापती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे. १ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी झाल्यानंतर निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>>अमरावती मार्गावर वाघिणीचा मृतदेह

महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी वंचित बहुजन आघाडीने रिजवाना परवीन शेख मुख्तार यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सुमन गावंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वंचितच्या रिजवाना परवीन यांना २७ मते, तर राष्ट्रवादीच्या सुमन गावंडे यांना २६ मते मिळाली. समाजकल्याण सभापती पदावर वंचितच्या आम्रपाली खंडारे विजयी झाल्या. त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे डॉ. प्रशांत अढाऊ यांचा पराभव केला. या निवडणुकीत वंचितला २७ मते पडली, तर शिवसेना उमेदवाराला २५ मते मिळाली. शिवसेनेच्या एक महिला सदस्य मतदानाला अनुपस्थित होत्या. वंचितच्या माया नाईक आणि योगिता रोकडे या दोघींनी विषय समिती सभापती पदांवर विजय मिळवला. २७ विरुद्ध २६ मतांनी त्यांनी महाविकास आघाडीचे सम्राट डोंगरदिवे आणि गजानन काकड यांचा पराभव केला.

हेही वाचा >>>नागपूर-पुणे आठ तासात ; गडकरी यांची घोषणा

सभावती पदाची निवडणूक न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहून घेण्यात आली. शिवसेनेच्या सदस्या लता पवार यांचे सदस्यत्व जातवैधता प्रमाणपत्र न जोडल्याने विभागीय आयुक्तांनी रद्द केले होते. उच्च न्यायालयाने आदेशाला तात्पुरती स्थगिती देत त्यांना मतदान करू देण्याला परवानगी दिली होती. त्यांच्या सदस्यत्वाबाबत १ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी झाल्यानंतर आजच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपची मते फुटली आहेत. भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. दोन सदस्यांनी वंचितला मतदान केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने गैरहजर राहत वंचितला अप्रत्यक्ष मदतीचा हात दिला होता. सभापती पदांच्या निवडणुकीत भाजपने थेट आंबेडकरांच्या पक्षाला मतदान केले. फडणवीस यांनी पालकमंत्री पद स्वीकारतात वंचित व भाजपचे नवे समीकरण उदयास आले आहे. त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.