अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरात ईदनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांसमोर वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारावर भाजपा खासदार अनिल बोंडे आणि निवेदिता चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला.

हेही वाचा – “सहानुभूती, डोळ्यात पाणी,” राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका; म्हणाले “कोणतीही लाट…”

काय म्हणाले अनिल बोंडे?

ईदनिमित्ताने परवाड्यात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वादग्रस्त नारे देण्यात आले. ही कोणती मानसिकता आहे? मिरवणूक काढायला विरोध नाही. मात्र, कोणाचा जीव घ्यावा या मानिकतेचा आम्ही विरोध करतो. आम्ही याबाबत पोलिसांशी बोललो आहे. या मिरवणूक सहभागी झालेले अनेक जण पीएफआयशी संबंधित आहेत. यांच्यावर कारवाई व्हावी, आणि त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

जिल्ह्यात दंगे घडविण्याचे षडयंत्र

भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारची सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून हिंदू-मुस्लीम दंगल भडकावून मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. अमरावती शहरात झालेल्या दंगलीवेळीही हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, यावेळी हिंदू समाज शांत बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच याबाबत कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना निवेदनही दिले आहे.

हेही वाचा – “जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल…”; राज ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर संदीप देशपांडेंनी व्यक्त केला विश्वास

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात ईदनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महावीर चौक, पेन्‍शनपुरा परिसरात वादग्रस्त गाणे आणि घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकाराची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम यांच्‍या तक्रारीनुसार पोलिसांनी शेखपुरा परिसरात राहणाऱ्या आठ ते दहा जणांविरोधात गुन्‍हे दाखल केले. दरम्यान, अचलपूर-परतवाडा हे जुळे शहर जातीयदृष्‍ट्या संवेदनशील मानले जाते. काही महिन्‍यांपूर्वीच अचलपुरात धार्मिक झेंडा काढण्‍याच्‍या घटनेनंतर दोन समुदायात संघर्ष निर्माण झाला होता.