अमरावती : बँकांना तीन महिने पुरग्रस्तांकडून कुठलीही वसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना तीन महिने कोणताही त्रास होणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यावर माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आता पुढे काय चमत्कार होणार आहे, की तुम्ही महापूजा ठेवली आहे. तीन महिन्यानंतर काय गेलेले पीक उभे राहणार आहे. इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर मी आयुष्यात पाहिला नाही. मुख्यमंत्री इतके बनावट आहेत की झेरॉक्स तरी बरी निघते. यांची झेरॉक्सच निघत नाही, अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू म्हणाले, ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार २०१९ मध्ये हेक्टरी ६ हजार ८०० रुपये इतकी मदत नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात आली होती. २०२१ मध्ये सरकारने ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा दुप्पट १३ हजार ६०० रुपये मदत दिली. आता २०२५ मध्ये सरकारने मदतीची रक्कम कमी केली. शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये इतकीच मदत मिळणार आहे. आता सरकारने याचे ‘लॉजिक’ सांगितले पाहिजे. मदतीची रक्कम का कमी केली, याचे कारण सरकारने सांगितले पाहिजे. इतक्या वर्षात काय महागाई कमी झाली, की पगार कमी झाले. आमदारांचे मानधन कमी झाले का किंवा तुमचे बजेट कमी झाले का, याचे कारण सरकार सांगायला तयार नाही.
बच्चू कडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांत परिस्थितीत काय बदल झाला, की मागच्यापेक्षा यंदा मदत का कमी दिली जातेय, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. शेती उत्पादनाचा खर्च वाढला आहे. बियाणे, खतांची किंमत वाढली, शेतकरी नुकसान सहन करतो. सरकार अनुदान मात्र कमी देते, या बाबींचा निषेधच केला पाहिजे. माझ्या पक्षाचे सरकार आहे, म्हणून प्रश्न विचारू नका, अशी भावना शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये आली, तिथे शेतकरी मेला आहे. बाप मेला तरी बेहत्तर पण, नेता जिवंत राहिला पाहिजे आणि पक्षाचा जयजयकार केला पाहिजे, ही मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. शेतकरी पेटून उठत नसल्याने तरूण कार्यकर्त्यांमधील ही मानसिकता वाढीस लागली आहे. शेतकरी विखुरलेला आहे, तो काही संताप व्यक्त करीत नाही, म्हणून सातत्याने हा अन्याय चालू आहे. सरकारची बनवाबनवी सुरू आहे आणि शेतकरी मुकाट्याने हे सर्व सहन करीत आहे, हे दुर्देवी आहे.