नागपूर: नागपूर महामेट्रोने २०१५ ते २०२१ दरम्यान ८८१ पदांची भरती प्रक्रिया केली. परंतु, त्यात मागासवर्गीयांच्या आरक्षणाला छेद दिला. याविरोधात आंदोलन करण्यात आले. परंतु, त्यानंतरही दुरूस्ती झाली नसल्याने दिवाळीनंतर पुन्हा आंदोलन केले जाईल, अशी घोषणा जय जवान जय किसान संघटनेतर्फे शुक्रवाररी पत्रपरिषदेत करण्यात आली.

 संघटनेचे सचिव अरुण वनकर म्हणाले, महामेट्रो ही केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे येथे एकूण पदांमध्ये एससी वर्गासाठी १५ टक्के, एसटी संवर्गासाठी ७.५ टक्के, ओबीसीसाठी २७ टक्के, ईडब्लूएससाठी १० टक्के आरक्षण आहे. त्यानुसार महामेट्रोने पदभरतांना संबंधित संवर्गाचे उमेदवार घेणे अपेक्षित होते. परंतु सगळे नियम धाब्यावर बसवून एससी संवर्गातील १३२ उमेदवारांऐवजी केवळ ४२, एसटी संवर्गातील ६६ एवजी २४, ओबीसी संवर्गातील २३८ एवजी ११३, ईडब्लूएसमधील ८८ एवजी १२ उमेदवारच घेतले. 

हेही वाचा >>> रेल्वे प्रवाशांवर ‘विशेष’ भाड्याचा भुर्दंड, तिकिटासाठी मोजावे लागणार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुल्या संवर्गात मात्र ३५७ ऐवजी तब्बल ६९० उमेदवार घेतले. त्यामुळे महामेट्रोने जाणीवपूर्वक मागासवर्गीयांवर अन्याय केल्याचे दिसत आहे. या विषयावर जय जवान जय किसान संघटनेने आंदोलन केले. त्यावर तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आश्वासन दिले. परंतु, काही झाले नाही. त्यामुळे दिवाळीनंतर संघटनेकडून आंदोलन केले जाईल. तर सध्या जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रसंगी विजयकुमार शिंदे, मिलिंद महादेवकर, प्रकाश डोंगरे, अभिनव फटिंग उपस्थित होते.