वर्धा : भाजपच्या विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची आज निवड झाली. त्याचा देवेंद्रप्रेमी भाजप नेते व कार्यकर्त्यांना विशेष आनंद झाला असून तसा जल्लोष व्यक्त होवू लागला आहे. फडणवीस यांनी पक्ष बांधणी काळात विशेष लक्ष देत खड्डे बुजवून काढण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटल्या जाते.

वर्धा जिल्ह्यात चारही जागा भाजपने जिंकाव्या, असे ते म्हणत. भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर ते देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास गेले होते. तेव्हा फडणवीस म्हणाले होते की गफाट ही अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या पक्षात महत्वाची असते. आव्हान असतात. तुमच्या पुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे वर्धा जिल्ह्यातील सर्व चारही आमदार भाजपचे निवडून आले पाहिजे. कामाला लागा, यशस्वी व्हा असे फडणवीस म्हणाल्याची आठवण गफाट सांगतात. या निवडणुकीत वर्धा डॉ. पंकज भोयर, हिंगणघाट समीर कुणावार, देवळी राजेश बकाने व आर्वीत सुमित वानखेडे हे निवडून आले आहेत. देवळीत भाजपचा कधीच विजय होत नाही, याची खंत भाजप ज्येष्ठ नेहमी बाळगत. यावेळी पण वर्धा भाजप नेते देवळीची जागा भाजप साठीच मागून घ्या असं आग्रह फडणवीस यांच्याकडे करून आले होते.

हेही वाचा : महाराष्ट्राचे ऊर्जामंत्रीपद कुणाला मिळणार… सलग दहा वर्षांपासून नागपूर…

तेव्हा ही आता शेवटची संधी. यावेळी जर देवळीत भाजप पराभूत झाला तर ही जागा कायमची मित्रपक्षांस सोडून देणार, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे सर्वाधिक लक्ष देवळीत देण्यात आले. खुद्द जिल्हाध्यक्ष गफाट यांना देवळीतच पूर्ण वेळ देण्याची व इतर मतदारसंघात नं जाण्याची सूचना करण्यात आली होती. त्यांनी सर्व देवळी संबंधित नेत्यांची गाठ बांधली. कुठेही काही कमी पडू नं देण्याची खबरदारी घेत विजय प्राप्त केल्याचे भाजप पदाधिकारी सांगतात. आज गफाट म्हणतात की फडणवीस यांचा सर्व चार जागा निवडून आणण्याचा शब्द आम्ही पूर्ण केला आणि ते मुख्यमंत्री व्हावेत ही आमची ईच्छा आता पूर्ण होणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : गटनेता निवडीच्या बैठकीत अकोल्याला मानाचे स्थान, आ. रणधीर सावरकरांवर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व चारही आमदार व जिल्हाध्यक्ष हे पूर्वीच फडणवीस यांना भेटून आले. तेव्हा जिल्ह्यास मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा बोलून दाखविली होती. त्यामुळे उदया ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे शपथ घेतील, तेव्हा वर्धा जिल्ह्यातील आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार कां, अशी उत्सुकता भाजप नेत्यांना लागून राहली आहे. वर्धा जिल्ह्यातून महत्वाचे १०० पदाधिकारी आज शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुंबईस रवाना होत आहे.