लोकसत्‍ता टीम

अमरावती : येथील साईनगर ते सातुर्णा मार्गावर व्‍यँकटेश लॉन नजीक एका युवकाची बुधवारी रात्री उशिरा तलवार, चाकूने वार करून हत्‍या करण्‍यात आली. पोलिसाना गुरूवारी पहाटे या युवकाचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील एका नालीत आढळून आला. टोळीयुद्धातून ही घटना घडल्‍याचे सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच गोपालनगर परिसरातील नागरिकांनी राजापेठ पोलीस ठाण्‍यासमोर गर्दी केली होती. काही दिवसांपुर्वीच केडिया नगर परिसरात एका युवकाची टोळीयुद्धातून हत्‍या करण्‍यात आली होती. या घटनेची शाई वाळत नाही, तोच ही घटना घडल्‍याने शहरात खळबळ उडाली आहे. यश रोडगे (२१, मराठा कॉलनी, गोपालनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी सात ते आठ जणांच्‍या विरोधात हत्‍या, हत्‍येचा प्रयत्‍न, अपहरण आणि शस्‍त्र कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. त्‍यातील दोन जणांना अटक करण्‍यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्‍यात येत आहे.

आणखी वाचा-विधी क्षेत्रातील दिग्गज शनिवारी बुलढाण्यात!

यश रोडगे हा आपल्‍या एका मित्रासमवेत सातुर्णा परिसरातील व्‍यँकटेश लॉन येथे उभा असताना सात ते आठ जणांनी त्‍याच्‍यावर तलवार, चाकूने हल्‍ला चढवला आणि त्‍याला दुचाकीवर बसवून शहराबाहेर नेले. त्‍याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर बुधवारी उशिरा रात्री त्याचा मृतदेह नालीत फेकून देण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. यश रोडगे याला शोधण्यासाठी राजापेठ पोलीस, गुन्हे शाखा व विशेष पथक चार ते पाच तास कार्यरत होते. अखेर पहाटे तीनच्या सुमारास त्याचा मृतदेह भातकुली नाका परिसरातील कचरा डेपोच्या रोडच्या बाजुला असलेल्या नालीत आढळून आला. त्‍यानंतर गुन्हा दाखल करण्याची व आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात आली.

आणखी वाचा-MPSC Exam : पाच हजार विद्यार्थ्यांसाठी दोन लाख उमेदवारांचे नुकसान, आता परीक्षा ऑक्टोबरमध्ये?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्‍येची पार्श्‍वभूमी

६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री गोपालनगर टी पॉईंटजवळून अंकुश मेश्राम उर्फ लावा (२२, म्हाडा कॉलनी) याचे अपहरण करून त्‍याची हत्‍या करण्यात आली होता. ८ सप्टेंबर रोजी रात्री कोंडेश्वर जंगल भागात लावाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी राजापेठ पोलिसांनी सनी प्रधान याच्यासह पाच ते सहा अल्पवयीनांविरूध्द हत्‍येचा गुन्हा दाखल केला होता. लावाच्या हत्‍येत यश रोडगेचा सहभाग असल्याच्‍या संशयावरून बुधवारी रात्री लावाप्रमाणेच यश रोडगेचे अपहरण करण्यात आले. त्याचा मृतदेह शहराबाहेर नेऊन टाकण्यात आला. टोळीयुद्धातून ही घटना घडल्‍याने सांगण्‍यात येत आहे.