गडचिरोली : तेलंगणा सरकारने महाराष्ट्र सीमेवर उभारलेल्या वादग्रस्त मेडीगड्डा धरणाचा पुलाचा पाया खचल्याने गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने पुराचा धोका निर्माण झाला असून जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. तर त्या मार्गावरील रहदारीदेखील रात्रीपासून बंद करण्यात आली आहे.

नागरिकांच्या प्रचंड विरोधानंतरही महाराष्ट्र- तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीवर मेडीगड्डा धरण उभारण्यात आले. दरवर्षी या धरणातील पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान होते. दरम्यान, २१ ऑक्टोबरला रात्री उशिरा अचानक मेडीगड्डा धरणावरील महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरील पुलाचे २०, २१ व २२ क्रमांकाचे खांब खचले. त्यामुळे सायरनद्वारे सूचना देऊन दाेन्ही बाजूंनी रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला. त्यानंतर धरणाचे काही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यत आला. सिंचन विभागाचे तज्ज्ञ अभियंता व वरिष्ठ अधिकारी तेथे तळ ठोकून आहेत, सध्या युद्धपातळीवर दुरुस्तीकाम सुरू आहे. परंतु अचानक पाणी सोडल्याने आसरअल्ली, सोमनूर संगम, टेकडामोटला अशा १५ ते २० गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नदीकाठी सिचंनासाठी विद्युतपंप, पाईप, वायर या पाण्यात वाहून गेले. मिरची, कापूस उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – अखर्चित निधी फेब्रुवारीपर्यंत खर्च करता येणार, शासन निर्णयाने दिलासा

मेडीगड्डा प्रकल्प सिरोंचा तालुक्यातील लोकांसाठी नुकसानकारक आहे. बॅकवॉटरमुळे दरवर्षी शेतीचे नुकसान होते. आता पूल खचल्याने अचानक विसर्ग केल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. बाधित शेतकऱ्यांना तातडीन भरपाई द्यावी. – चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा – गोंदिया : अवैध सागवान वृक्षतोडप्रकरणी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी जाधव व क्षेत्रसहाय्यक पठाण निलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री पुलाचाही भाग खचल्याचे निदर्शनास आल्यावर तातडीने रहदारी बंद केली. तेथे सिंचन विभागाकडून दुरुस्तीकाम सुरू आहे. नागरिकांना दक्षतेचे आवाहन केले आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. – जितेंद्र शिकतोडे, तहसीलदार सिरोंचा