बुलढाणा : जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात पाणी टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. पाणी टंचाईचा सामना करतानाच प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना निधीच्या टंचाईचासुद्धा सामना करावा लागत आहे. विविध उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असले तरी आणि पावसाळा तोंडावर आला असतानाही शासनाकडून कवडीचाही निधी प्राप्त न झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे चित्र आहे.
बुलढाणा जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ५४ गावांना ५९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मेहकर तालुक्यात १२ गावांना १२ टँकर, बुलढाणा तालुक्यात १२ गावांना १३, लोणारमधील १ गावाला १, देऊळगाव राजा तालुक्यात ११ गावांना १४, चिखली तालुक्यात १० गावांना १०, तर सिंदखेड राजा तालुक्यातील ८ गावांना ९ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
या ५४ गावांची लोकसंख्या १ लाख ३० हजार ४९९ इतकी आहे. यामुळे सव्वालाख गावकऱ्यांची तहान केवळ टँकरद्वारे भागवली जात आहे. दुसरीकडे ९ तालुक्यातील २२७ गावांना २८३ खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. यामुळे कमीअधिक ३ लाख ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकर आणि खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यावरून पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होते.
खर्चाचे मिटर सुसाट!
दुसरीकडे, पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. आजवर २३१ गावांत ३५२ योजना पूर्ण करण्यात आल्या आहे. ९ कामे प्रगतीपथावर आहेत. उपाययोजनांमध्ये टँकर आणि अधिग्रहित विहिरींचा खर्च जास्त आहे. ६ जूनअखेर ४ कोटी ३२ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहे. टँकरने पाणीपुरवठ्यावर सर्वाधिक म्हणजे ३ कोटी १३ लाख २६ हजार रुपये, तर खासगी विहीर अधिग्रहणावर १ कोटी १७ लाख ४६ हजार रुपये खर्च झाले आहे. मात्र डिसेंबर ते आजपावेतो राज्य शासनाकडून जिल्ह्याला कवडीचाही निधी मिळाला नाही. त्यामुळे ही कामे उसनवारीवरच सुरू असल्याचे चित्र आहे.
टँकर लॉबी अन् अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे
दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई ही पाचवीला पूजलेली असते. टंचाई जास्त असली की ग्रामीण जनतेचे बेहाल होतात, त्यांना भटकंती करावी लागते. मात्र टँकर लॉबी आणि भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांचे उखळ पांढरे होते, ही दुर्देवी स्थिती यंदाही कायम आहे.