बुलढाणा : जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा फटका बसला. यामध्ये पिकांची नासाडी झाली असून बारा घरांची पडझड झाली असतानाच मृत जनावरांची संख्या सव्वादोनशेंच्या घरात पोहोचली आहे.

रविवारपाठोपाठ सोमवारी रात्रीदेखील अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ११ हेक्टरवरील तूर, कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाला व संत्रा, केळी, ऊसाचे नुकसान झाले. प्राथमिक सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. १२ घरांची अंशतः पडझड झाली आहे. याशिवाय २२२ जनावरे दगावल्याचे आढळून आले. यामध्ये १९६ लहान तर २६ मोठ्या पाळीव जनावरांचा समावेश आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा – मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेल्या रविकांत तुपकरांना शासकीय बैठकीचे निमंत्रण; म्हणाले…

धुक्यानी वाढविली शेतकऱ्यांची चिंता!

जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. रविवारच्या तुलनेत सोमवारच्या रात्री पडलेल्या पावसाची तीव्रता कमी होती. रविवारी रात्री वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीसह झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले होते. तब्बल २९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर दोन मंडळात १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. यातुलनेत सोमवारी रात्री झालेला पाऊस मध्यम स्वरूपाचा होता.

जळगाव जामोद ३६ मिलीमीटर, संग्रामपूर ३२.८, चिखली २१, बुलढाणा १३, देऊळगाव राजा २२.३, मेहकर २६, सिंदखेडराजा २१ मिमी, लोणार १३, खामगाव २८, शेगाव ३१.३ मलकापूर २४.४, मोताळा २०, नांदुरा २० मि.मी., अशी तालुकानिहाय पावसाची आकडेवारी आहे. जिल्ह्यात सरासरी ५७.३ मिमी पावसाने हजेरी लावली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ‘‘पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने नसेल, प्रशासनाला परिणाम भोगावे लागतील,” राष्ट्रवादीचे प्रसेनजीत यांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुरीला सर्वाधिक फटका

अवकाळी पावसाचा ऐन बहरात असलेल्या तुरीला जबर फटका बसला. यामुळे ८२ हजार हेक्टरवरील तूर पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट येण्याची शक्यता आहे. त्यात जिल्ह्याच्या बहुतांश भागात धुके पसरले आहे. यामुळे तुरीवर रोगराई येण्याची दाट शक्यता आहे. यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले आहे.