नागपूर : नागपूर-चंद्रपूर-वर्धा मार्गाला जोडणाऱ्या हैदराबादकडे जाणाऱ्या बुटीबोरी येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल केवळी तीन वर्षात खचल्याची बाब गंभीर आहे. याबाबत केंद्रीय नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार असून शहरातील सर्व उड्डाण पुलाचे सुरक्षा ऑडीट केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अतिशय वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील बुटीबोरी उड्डाण पुलाला तडे गेले आहेत. या घटनेनंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांब रांगा दिसून येते आहे. याबाबत फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच शहरातील सर्व उड्डाण पुलाचे सुरक्षा अंकेक्षण केले जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा : Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले, “संविधानातील सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नव्हे, तर…”

व्हीएनआयटीकडून पुलाची पाहणी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तज्ज्ञ, व्हीएनआयटीचे प्राध्यापक आणि उड्डाणपुलाचे डिझाइनर यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली. तज्ज्ञांनी पुलाला ज्याठिकाणी तडे गेले आहेत, त्याठिकाणचे सॅम्पल घेतले आहेत. त्याची तपासणी करून तडे जाण्याचे नेमके कारण शोधण्यात येणार आहे. राष्ट्रीय प्राधिकरणाच्यावतीने बुटीबोरी मार्गावर १.६९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल जून २०२१ मध्ये उभारण्यात आला. तब्बल ७० कोटी खर्चून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. बुटीबोरी मार्गावर होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी या पुलाची उभारणी करण्यात आली होती. बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तज्ज्ञ तसेच व्हीएनआयटीच्या प्राध्यापकांच्या चमूने या पुलाची पाहणी केली. पुलावरील वाहतूक खालील मार्गावरून वळती करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. पूल सुरू होण्यापूर्वी व्हीएनआयटीचे प्राध्यापक आणि पुलाचे डिझाईन तयार करणाऱ्या तज्ज्ञांनी या उड्डाणपुलाची चाचपणी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून केली होती. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा : अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार देखभाल-दुुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी एक जडवाहन पुलाच्या काठावरून गेला. त्यामुळे पुलाचा काही भाग खचला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलाखालील ‘सर्व्हिस रोड’ वाहतूक सुरू आहे. पुलाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल, असेही ते अधिकारी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व पुलांचे नियमित परीक्षण व्हावे

पुलांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे या घटनेवरून दिसून येते. अशाप्रकारे पुलाचे काम होत असेल तर नागरिकांच्या जीवाला धोका आहे. बुटीबोरीसह शहरातील सर्व पुलांचे नियमित परीक्षण होणे आवश्यक आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदार आणि ज्याच्या निगराणीखाली हे काम झाले अधिकारी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असे कर्मयोगी फाऊंडेशनचे पंकज ठाकरे म्हणाले.