नागपूर: खोट्या दस्तावेजांच्या आधारे शिक्षिकेला अतिरिक्त केल्याच्या प्रकरणात संस्थाचालकासह शिक्षणाधिकाऱ्यासह एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालार्थ आयडी घोटाळ्याचे प्रकरण ताजेच असताना शिक्षण विभागातील हे फसवणुकीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
ओमनगर येथील सुधीर शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्वश्री उच्च प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. निलकमल बोरकर (४५, हुडकेश्वर) असे तक्रारदार शिक्षिकेचे नाव आहे. शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, संस्था अध्यक्षा संगिता विश्वनाथ रहाटे, संस्था सचिव राजेश मासुरकर, ऐश्वर्या राजेश मासुरकर, प्रकाश काशीनाथराव मासुरकर, भारती दीपकराव खडसे, सुनिल उदयभान तायवाडे, सुनिता लक्ष्मणराव झोडे, माजी मुख्याद्यापिका अरुणा रमेश बांते अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारीनुसार निलकमल बोरकर यांना बनावट सेवाज्येष्ठता यादी तयार करुन व पटावर विद्यार्थी असूनही पोर्टलवर शुन्य विद्यार्थी संख्या दाखवून अतिरीक्त ठरविण्यात आले. त्यासाठी आरोपींनी कट रचला होता. संबंधीत शिक्षिकेला मुख्याध्यापक पदाचे अधिकार मिळू नये यासाठी त्यांना अतिरीक्त ठरविण्यासाठी संस्था सचिव राजेश मासूरकर यांनी हे सर्व कट कारस्थान केले असल्याचा आरोप तक्रारीत लावण्यात आला आहे. बोरकर यांनी माहिती अधिकारात माहिती मागविली असता हा प्रकार उघडकीस आला. हा घोटाळा उघडकीस आल्यावर तत्कालिन उपसंचालक उल्हास नरडने शिक्षणाधिकारी काळुसेला कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र काळुसेने संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापिकेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी टाळाटाळ केली.
अखेर बोरकर यांनीच हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी उपलब्ध दस्तावेज व पुराव्यांच्या आधारावर सर्व आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर अशा प्रकारे फसवणुकीबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. संस्थाचालक राजेश मासुरकर याने अनेक घोटाळे या शाळेत केले आहेत. मासुरकरने गौरी गोस्वामी नावाच्या शिक्षिकेची बनावट बी.एड. पदवी तयार करुन नोकरीवर ठेवले होते. त्यात मासुरकरला अटक झाली होती.
तीन दिवसांत पटसंख्या ९३ वरून शून्यावर३० सप्टेंबर २०२३ रोजी शाळेची पटसंख्या ९३ इतकी होती. त्याच दिवशी अरूणा बांते या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या. १ व २ ऑक्टोबर रोजी शाळेला सुटी होती. ३ ऑक्टोबर रोजी शाळेत पहिली ते चौथीचा एकही विद्यार्थी हजर नव्हता. राजेश मासुरकरने बांते निवृत्त झाल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी टीसी काढून घेतल्याचा दावा केला होता. पटसंख्या शून्य झाल्याने तुम्ही अतिरिक्त झाल्या असल्याचे बोरकर यांना सांगण्यात आले. प्रत्यक्षात ते विद्यार्थी शाळेतच शिक्षण घेत होते.