यवतमाळ  : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत. त्यासाठी देशात एक लक्ष कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.  त्यामुळे पुढील तीन वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज शनिवारी ३३५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच अनेक उपक्रमांचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते  बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतीगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना, उपक्रम राबविण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

आदी कर्मयोगी योजनेत जिल्ह्यातील ३६६ गावांची निवड झाली आहे. सुमारे ३५ मे. वॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला १२ तास दिवसा वीज मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले.  जिल्ह्यात पावसाने शेती, घरे, पशुधन यांचे नुकसान झाले. त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला. त्यात आदिवासी विकास विभागाचे पाच वसतिगृहे व इतर कामे मिळून ५१ कोटी रुपये किंमतीच्या कामांचा समावेश आहे. तसेच बांधकाम विभागाची ६७ कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत ११ सौर ऊर्जा प्रकल्प व इतर कामांसाठी १५८ कोटी व इतर विविध विभागांच्या ५९ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

यावेळी मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्स, रोड मेंटेनन्स डिजीटल प्लॅटफॅार्म, ई-मित्र चॅटबॅाट, मिशन उभारी, समग्र डॅशबोर्ड, प्रोजेक्ट सॅंन्ड मॅप, शासन आपल्या मोबाईलवर, सीआरएफ ॲन्ड वॉर रूम डॅशबोर्ड यासह इतर विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. जिल्हा डॅश बोर्डच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा रिअल टाइम आढावा आणि मॉनिटरिंग करणे सोपे होणार असून कमी कालावधीत योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर २७ उमेदवारांना सेवेत घेण्यात आले. त्यातील चार उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.