नागपूर : मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला आणि गुलाबी थंडीची चाहूल लागली. मात्र, पावसाच्या अनपेक्षित हजेरीने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. बुधवारी सिंधुदुर्गापासून कोल्हापुरापर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळाली. महाराष्ट्राची राजधानी मुंबईदेखील याला अपवाद ठरली नाही. तर दक्षिण भारतामध्येही अनेक राज्यांना पावसाने झोडपले. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस पावसाची हजेरी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पावसाळी असण्याची दाट शक्यता आहे. हेही वाचा - बुलढाणा: गिट्टीच्या ढिगाखाली दबून मध्यप्रदेशातील मजुराचा मृत्यू हेही वाचा - बुलढाणा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! चालकासह प्रवासी ठार दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या पावसाचा काहीसा परिणाम म्हणून गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली भागात गुरुवार - शुक्रवारी पावसाची हजेरी असेल. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये आकाश अंशत: ढगाळ असेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्याच्या स्थितीत पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र तयार झाले आहे. ज्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे आणि राज्यातील तापमानात मोठे बदलही पाहायला मिळत आहेत.