चंद्रपूर: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत सर्व पुरुष खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पत्नी गोपिका कन्नमवार यांच्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या रुपाने महिला उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे.

या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व खासदार पुरुष निवडून आले आहेत. महिलांना येथून संधी मिळाली नाही हा आजवरचा इतिहास आहे. २०१९ पर्यंत झालेल्या १७ लोकसभा निवडणुकीत अनेक अपक्ष महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र काँग्रेस या प्रमुख राष्ट्रीय पक्षाने १९६७ मध्ये प्रथम या लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांच्या पत्नी गोपिका कन्नमवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. तेव्हा त्यांची थेट लढत ही अपक्ष काका कौशिक यांच्यासोबत झाली होती. कौशिक यांना तेव्हा १ लाख ३९ हजार ३१० मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या गोपिका कन्नमवार यांना १ लाख २२ हजार ४७४ मते मिळाली होती. अशा पद्धतीने काँग्रेसने एका महिला उमेदवाराला संधी दिल्यानंतर अपक्ष उमेदवाराकडून पराभव झाला होता. त्यानंतर ५४ वर्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या रुपाने एका महिलेला संधी दिली आहे. आमदार धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. पतीच्या अकाली मृत्यूनंतर नैसर्गिक न्यायप्रमाने पत्नीला उमेदवारी मिळावी असा आग्रह आमदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस श्रेष्ठीकडे लावून धरला होता. त्यानंतरच त्यांना उमेदवारी मिळाली. मात्र आता त्यांची जबाबदारी वाढली असून पक्षाने दाखविलेला विश्वास खरा करून दाखवत विजय संपादन करावा लागणार आहे.

हेही वाचा – महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा अधिकच किचकट

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

महिला उमेदवारांची पराभवांची मालिका आमदार धानोरकर खंडित करतात का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे १९८० च्या लोकसभा निवडणुकीत जनता पार्टीने प्रतिमा नुरुद्दीन या मुस्लिम महिलेला काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र नुरुद्दीन यांना केवळ २३ हजार ८०४ मते मिळाली होती. तर पोटदुखे यांना २ लाख ६ हजार ४०० मते मिळाली होती. आमदार म्हणून या जिल्ह्यात माजी मंत्री यशोधरा बजाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीस व आमदार प्रतिभा धानोरकर या तीन महिला निवडून आलेल्या आहेत. मात्र खासदार म्हणून आजवर एकही महिला निवडून आलेली नाही हा आजवरच्या १७ लोकसभा निवडणुकीचा इतिहास आहे.