नागपूर : महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे.पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकार व अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून त्यांचा अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो, त्यांच्या दौऱ्याची माहिती आधिच दिलेली असते.पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत हे पटणारे नाही. सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून महायुती युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे.तो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? का मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते? हे समजले पाहिजे. शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला त्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का? असेही नाना पटोले म्हणाले.
फुले चित्रपट करमुक्त करा
राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल तर महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.