नागपूर आणि विदर्भात यापूर्वी कार्यकर्ता म्हणून यायचो. नंतर मंत्री म्हणून आलो. आता बाळासाहेब ठाकरे, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ५० आमदार यांच्यामुळे मुख्यमंत्री म्हणून विदर्भात येण्याची संधी मिळाली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी खोके, स्थगिती आणि घटनाबाह्य सरकार म्हणून टीका केली होती. त्याला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“बाबासाहेबांच्या घटनेनुसार कायदेशीर बहुमताच्या जोरावर हे सरकार स्थापन झालं आहे. तेही लोकांच्या जनमताचा आदर राखून. मागे विधिमंडळाच्या कारभारावर स्थगिती द्या, अशी मागणी विरोधी पक्षाने केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावलेली. २०१९ ला जे सरकार स्थापन झालं, ते पूर्णपणे अनैतिक होतं. सोयरिक एकाशी केली, संसार दुसऱ्याशी थाटला, हे जनतेला माहिती आहे,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“अजित पवारांच्या तोंडून खोक्यांची भाषा शोभणारी नाही आहे. खोक्यांचा एकावर एक ढिग लावला तर ‘शिखर’ इतके उंच होईल की, तिथेपर्यंत नजर पोहचणार नाही. तिथून कडेलोट होईल. तसेच, अनेक विभागांत तरतूद होती दोन हजार कोटींची आणि सहा ते सात हजार कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. आमदनी अठ्ठनी खर्च रुपय्या, आम्हाला राज्याचा लवासा करायाच नाही आहे,” असा टोला स्थगिती सरकार म्हटल्यावरून एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना लगावला आहे.