नागपूर: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून सत्ता मिळवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे बुधवारी नागपूर जिल्ह्यातील कामठीत काँग्रेसचा ‘वोट चोर, गद्दी छोड’ मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यात्रेतून पोहचले. त्यांच्यासोबत प्रदेश आणि जिल्या पदाधिकारी होते. सर्व मंचावर पोहोचल्याने येथे नेत्यांची चांगलीच दमछाक झाली.

मेळाव्यासाठी कामठीतील आंबेडकर चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह बरेच खासदार, आमदार आणि पदाधिकारी हजर होते. येथून रॅली मेळावा परिसरात आली. त्यानंतर प्रदेशाध्यक्षसह इतर नेते मंचावर आले. जिल्हा पदाधिकारीही मंचावर आल्याने तेथे गर्दी झाली. त्यानंतर नेत्यांना जिल्हा पदाधिकाऱ्यांना खाली उतरण्याची विनंती करावी लागली. यावेळी आमच्यावर नाव घेऊन उतरण्याची पाळी आणू नये अशी विनंती केली गेली. त्यानंतर काही पदाधिकारी खाली उतरले. परंतु गर्दी कायम होती.

दरम्यान भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार याद्या व मतदान प्रक्रियेत मोठा घोळ घालून सत्ता मिळवली, असा काँग्रेस पक्षाचा गंभीर आरोप आहे. या कथित मतचोरीची पोलखोल काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह केली आहे. त्यानंतर काँग्रेसने देशभरात ‘वोट चोर, गद्दी छोड’ आंदोलन सुरू केले असून त्याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कामठीत आज (बुधवारी, ३ सप्टेंबर) भव्य राज्यस्तरीय मेळावा आयोजित केला आहे. काँग्रेसच्या मते, हे आंदोलन लोकशाहीवरील “मतांची चोरी” आणि “विश्वासघात” याविरोधात असून, जनतेला खऱ्या घडामोडींची जाणीव करून देण्यासाठी कामठीतील मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे.

पार्श्वभूमी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मतचोरी झाल्याचा संशय व्यक्त झाला होता. देशातील विविध मतदारसंघांसह महाराष्ट्रातही भाजपाने बोगस मतदारांची नोंदणी करून व मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करून विजय मिळवला, असा काँग्रेसचा आरोप आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालेल्या मतदार याद्यांतील गोंधळ आणि बोगस मतांची नोंदणी याचे पुरावे राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणले. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यभरात जागृतीसाठी मेळावे घेण्याचा निर्णय घेतला असून, कामठीतील मेळावा हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.