नागपूर : उद्धव ठाकरेंच्या यांच्या खेडमधील सभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने कार्येकर्ते पाठविले असून त्यात मोठ्या प्रमाणात पैशाचा गैरवापर झाला आहे. या सभेमुळे उद्धव ठाकरे यांना सहानुभुती मिळणार असली तरी फायदा मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला होणार असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी दुपारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे नगसेवक, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख व कार्यकर्ते आहेत ते शिंदे यांच्याकडे जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू आहे. त्यांनी हिंदुत्ववादी विचाराशी तडजोड केली आहे त्यामुळे कुणीही शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या सोबत राहण्यास तयार नाही. त्यांच्याकडे असेलेले कार्यकर्ते आता शिंदेकडे आणि काही भाजपकडे येत आहे असा दावा त्यांनी केला. येणाऱ्या दिवसा उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीसाठी कुठेही उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती येईल असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >>> समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबेना; भरधाव फॉर्च्युनर कठड्याला धडकली, दोन जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांनी कसबा निवडणुकीबाबत पुन्हा एकदा विश्लेषण करावे,असा सल्ला देत बावनकुळे म्हणाले, कसब्याचा विजय महाविकास आघाडीचा विजय नसून तो धंगेकरांचा आहे.आम्हाला अपेक्षित मते मिळाले होते. मतांची जी वाढ झाली ती उमेदवाराची आहे. त्यांनी आता महाराष्ट्राची तयारी करावी. चारही पक्षांनी एकत्र यावे, आम्ही ५१ टक्केची तयारी करू. अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेचा दुरुपयोग झाला आहे. त्यामुळे खरे तालिबानी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे असेही बावनकुळे म्हणाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी होळीच्या दिवशी टीका करण्यापेक्षा त्यांनी त्यांचा पक्षातील कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ नये याकडे लक्ष द्यावे. गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे अनेक नेते भाजपात येत आहे. कॉंग्रेस संपत असल्यामुळे त्यासाठी पटोले यांनी होळीला नमस्कार करून कॉंग्रेस फुटू नये अशी प्रार्थना करावी अशी टीका केली.