महापालिकेच्या विरुद्ध उपोषण
शहराला पाणीपुरवठा करणारी ओसीडब्ल्यू, वीजपुरवठा करणारी एसएनडीएल आणि कचरा उचलणारी कनक रिसोर्सेस या कंपन्या ग्राहकांची लूट करीत असल्याने कंपन्यांचे कंत्राट रद्द करावे, या मागणीसाठी नगरसेवक बंटी शेळके यांनी महालातील गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता.
शहरातील विविध पक्षाचे नेते बंटी शेळके यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर करीत आहेत. शहरातील नागरिकांना पाण्याचे पाणी, वीज आणि स्वच्छता मिळावी म्हणून या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या सेवांविरुद्ध महापालिकेला निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करतात, असा शेळके यांचा आरोप आहे. ओसीडब्ल्यूकडून २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात १ तासही पाणी दिले जात नाही. शिवाय सदोष मीटर बसवून ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पाण्याचे बिल घेण्यात येत आहे. जुने मीटर चांगल्या स्थितीत असताना पूर्वसूचना देता नवीन मीटर बसण्यात आले.
महापालिकेत सफासफाईची स्वतंत्र यंत्रणा असताना देखील कचरा उचलण्याचे कंत्राट कनक रिसोर्स या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने काम हातात घेतल्यापासून अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढीग पडून आहेत. प्रभाग क्रमांक १८ मघ्ये आरआरएसचे मुख्यालय आहे तसेच केंद्रीय मंत्र्याचे निवास्थान असताना या प्रभागातील मलवाहिन्या तुंबल्या आहेत. नाल्या कचरा आणि चिखलाने तुंबल्या आहेत. नाल्यातील घाणीमुळे परिसरातील नागरिकांना विविध आरोग्य समस्या उद्भवू लागले आहेत.
एसएनडीएलकडे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी दिल्यानंतर मीटर बदलणे, वीजपुरवठा वारंवार खंडित होणे आणि महिन्याच्या शेवटी भरमसाठ बिल हाती पडणे असे घडत आहे. यामुळे शहरातील जनता त्रस्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात एनएनडीएल नाही. तसेच त्या भागात पाण्याचे बिलासंबंधी तक्रारी नाहीत, परंतु उर्वरित शहरात वाढीव वीज बिल आणि वाढीव पाणी बिलाची समस्या असून नागरिक त्रस्त आहेत. या तीनही कंपन्यांचे कंत्राट रद्द झाल्यावरच शहरवासीयांना दिलासा मिळेल, असे नगरसेवक बंटी शेळक म्हणाले.