नागपूर : काँग्रेस नेत्यांना त्रास देण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) दुरुपयोग, देशातील आर्थिक आणीबाणीपासून वाचवण्यासाठी आणि स्वयंपाक गॅस सिलिंडर, पेट्रोलच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस विचार जनजागृती अभियानतर्फे ज्येष्ठ समाजसेवक विजय लापलीकर यांच्या नेतृत्वाखाली व्हॅरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ धरणे देण्यात आले.

आधीच आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जनतेला मोदी सरकारने महागाईची आणखी एक भेट दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यांचा फायदा जनेताला देण्याऐवजी ‘सौगात ए मोदी’ सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली. सरकार उत्पादन शुल्क वाढवत आहे. सध्या कमी किमतींवर उत्पादन शुल्क वाढवून सरकार तिजोरी भरत आहे.

यूपीएच्या काळात पेट्रोल आणि सिलेंडरच्या किमती थोड्या जरी वाढल्या तरी रस्त्यावर सिलिंडर ठेवून गोंधळ घालणारे भाजपचे सर्व आंदोलनजीवी नेते आज पसार आहेत. आणि या मुद्द्यांवरून देशातील लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, मोदी सरकार सूडबुद्धीने काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाच्या नेत्यांविरुद्ध ईडीमार्फत कारवाई करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

२०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, त्यांचे एकमेव उद्दिष्ट त्यांच्या निवडक उद्योगपतींना फायदा पोहोचवणे होते, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली, रोजगार गेल्या ४५ वर्षातील सर्वात कमी पातळीवर पोहोचला आणि महागाई गगनाला भिडली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के कर लादल्याने बाजार उद्धवस्त झाला आणि शेअर बाजाराला एका तासात १६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. एलआयसी आणि बँकांनी शेअर बाजारात कोट्यवधी रुपये गुंतवले असूनही, डॉलरच्या तुलनेत रुपया दिवसेंदिवस घसरत आहे. त्यामुळे परकीय चलन साठ्याची कमतरता होते आहे. देशाचे सोने गहाण ठेवले आहे. भारतातील टॉप १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीतून एलआयसी बाहेर फेकल्या गेली आहे. परदेशी लोकांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास उडाला आहे आणि ते त्यांचे पैसे काढून चीन आणि इतर देशांमध्ये गुंतवत आहेत, असे विजय लापलीकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी संघटनेचे समन्वयक तनवीर अहमद, रवी पराते, बाबा खान, संग्रामसिंह परिहार, ताराचंद हाडके, राजू जिवने, प्रकाश शेगावकर, श्याम बागुल, सुनील अग्रवाल, सोहन पटेल, दामोदर धर्माळे, अब्दुल कदीर, गिरजाशंकर अग्रवाल, सूर्यकांत अग्रवाल, सूर्यकांत उईके, राजू पटेल, भद्दू कुर्यवंशी, आनंदसिंह बैस, रामप्रसाद गहरे, भीमराव हाडके, आदी उपस्थित होते.