नागपूर : शहरातील दहन घाटच ‘मरणासन्न’ अवस्थेत पोहोचले आहेत. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बांधलेल्या ओट्यांवरचे तुटलेले छत, परिसरातील अस्वच्छता, पाण्याचा अभाव, नादुरुस्त विद्युत अवस्था, असामाजिक तत्त्वांचा वाढलेला वावर, असे चित्र अनेक दहन घाटांवर आता नित्याचेच झाले आहे. एकीकडे स्मार्टसिटी म्हणून नागपूरचा उल्लेख करायचा आणि आवश्यक ठिकाणी पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करायचे, असा हा प्रकार असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

दहन घाटांचे सौंदर्यीकरण आणि सोयी सुविधांसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी ३ ते ५ कोटींची तरतूद केली जाते. ही रक्कम खर्चही होते, मात्र स्थितीत बदल होताना दिसत नाही. वाठोडा दहन घाटावरील शेड तुटलेले आहे. पावसाळ्यात सरणावर पाणी गळते. शांतीनगर येथील घाटावर अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेल्या ओट्यांवरील छत जीर्ण झाले आहे. गंगाबाई घाटावर स्वच्छतेचा अभाव आहे. मानकापूर, बेसा या घाटावर सायंकाळनंतर अंधार असतो. येथील विद्युत व्यवस्था नादुरुस्त आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होते. मानेवाडा घाटाच्या शेडमधील टाईल्स तुटलेल्या आहेत. घाटाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत अस्वच्छ आहे. अंबाझरी घाट कार्यालयाची अवस्था वाईट असून तेथे कर्मचाऱ्यांना बसणेही कठीण आहे. शिवाय ओट्यावरील शेड तुटलेले आहेत.

हेही वाचा – नागपूर : रेल्वे प्रशासनाची ‘ती’ चूक प्रवाशांना पडली महागात…

याशिवाय गंगाबाई घाट, सहकारनगर, वैशालीनगर, पारडी आदी घाटांवर सुविधांच्या अभावामुळे दहनघाटांवर आप्तेष्टांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काही दहनघाट असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनले आहेत. अनेक ठिकाणी झुडपे वाढली आहेत. घाटांवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे बाहेर जाऊन पाणी आणावे लागते.

कंत्राटदारांकडून लूट

दहन घाटाच्या स्वच्छतेचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. विभागाने देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मात्र, ते मनमानी शुल्क आकारतात अशी नागरिकांची तक्रार आहे. प्रत्येक घाटावर महापालिकेचा संबंधित अधिकारी किंवा कार्यालयाचे नाव व त्यांचा दूरध्वनी क्रमांक असलेला माहिती फलक लावण्याच्या सूचना असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. अनेक घाटांवर लाकूड आणि गोवऱ्यांची नोंद ठेवण्यात येत नाही. या सर्व प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : दहशत माजविणाऱ्या गुंडाची पाचजणांकडून हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरण रचण्यासाठी सहाशे रुपये

लाकूड व गोवऱ्यांसाठी तसेच सरण रचण्यासाठीसुद्धा पैसे मोजावे लागतात. पूर्व नागपुरातील गंगाबाई घाटावर ओट्यावर सरण रचून देण्याची व्यवस्था नि:शुल्क असताना तेथील कर्मचारी ५०० ते ६०० रुपये घेतात. पैसे दिले नाही तर ते काम करत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.