नागपूर: पहेलगाममध्ये मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास २६ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने देशासह जगात खळबळ उडाली आहे. याविरोधात सर्वत्र आंदोलन सुरू आहेत. विश्व हिंदू परिषदेने २५ एप्रिलला देशभर निषेध आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट यावरून चांगलाच आक्रमक झाला आहे.
राज्यभर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जबाबदार आहेत. भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण यामुळेच हा हल्ला झाला आहे. नेहमी राजकारणात गुंतलेला आणि सरकारे पाडण्याची कटकारस्थानी गृहमंत्री अमित शहा यांचे देशाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. राजकारणातून त्यांना सुरक्षेकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. या घटनेला जबाबदार असलेल्या शहा यांनी राजीनामा द्यावा, या पदावर एक मिनिटही राहण्यास ते योग्य नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शहरात नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. व्हेरायटी चौकात आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला बांगड्या दाखवत राजीनामा देण्याची मागणी केली.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. मोदी सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हडटवले. त्यानंतर जम्मू कश्मीर केंद्रशासित केले. केंद्र सरकारचे नियंत्रण राहवे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या दुर्घटनेची जबाबादारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची जबाबदारी असताना ही दुर्घटना कशी घडली, असा सवालही यावेळी आंदोलकांनी केला. यादरम्यान मोदी आणि शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.