नागपूर : केंद्रात भाजपची पक्षाची सत्ता आल्यावर राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्व अनेकपटीने वाढलेेले आहे. देशातील महत्वपूर्ण निर्णय दिल्लीतून होत नसून नागपूरमधून होतात, असे म्हटले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे नागपूरमध्ये संघाचे मुख्यालय आहे. २०१४ साली मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना महत्व आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वत:ला अभिमानाने स्वयंसेवक म्हणून संबोधतात. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसही संघाचे आवडते आहेत. फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संघाबाबत मोठे विधान केले. विशेष बाब म्हणजे, हा कार्यक्रम संघाचे स्मृती मंदिर असलेल्या रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रेशीमबाग परिसरातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाबाबत मोठे विधान केले, मात्र असे करताना त्यांनी संघाचे नाव घेणे टाळले.

नेमके काय म्हणाले फडणवीस?

विकसित कृषी संकल्प योजनेच्या अंतर्गत कृषी विभागाच्यावतीने रविवारी रेशीमबाग परिसरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन करताना चौहान बोलत होते. मंचावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री आशीष जायस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कार्यक्रमात केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी विकासाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली. घोषणा करताना चौहान यांनी छत्रपती ‌शिवाजी महाराजांच्या भूमीतून कृषी विकासाच्या योजनेची घोषणा करत असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवराजसिंह चौहान यांच्या घोषणेनंतर फडणवीस यांनी भाषण केले. फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीला चौहान यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले. ‘छत्रपती शिवाजी महाराष्ट्राच्या भूमीचे वैशिष्ट फार वेगळे आहे. यातही छत्रपतींच्या भूमीत असलेल्या नागपूरचे महत्व विशेष आहे आणि ज्या रेशीमबाग भूमीतून तुम्ही ही घोषणा करत आहात, ती तर फारच खास आहे. रेशीमबागमधून निघणारा आवाज संपूर्ण देशात जातो. त्यामुळे तुम्ही ही घोषणा योग्य ठिकाणावरून करत आहात’, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सभागृहात जोरदार प्रतिसाद मिळाला. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही स्मितहास्य देत फडणवीस यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले. फडणवीसांनी संघाचे नाव घेतले नाही, मात्र अशाप्रकारचे वक्तव्य करत पुन्हा एकदा संघाचे राष्ट्रीय राजकारणातील महत्व अधोरेखित केले.