अकोला : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाला नवीन भारत दिसला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्या ठिकाणच्या सैनिकी धावपट्ट्या देखील नेस्तनाबूत केल्या.
पाकिस्तानला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करावी लागली. त्यानंतर युद्धबंदी झाली, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावा फेटाळून लावला. आगामी निवडणुकांमध्ये जिरवणाऱ्यांना नव्हे तर पुरवणाऱ्यांना संधी द्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.
अकोला येथे बुधवारी आयोजित विकास संवाद सभेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश भारसाकळे, आ. वसंत खंडेलवाल, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आदींसह अकोला, वाशीम जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहर व जिल्ह्यातील दोन हजार ७०० कोटींच्या १९ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विकास कामांचा आढावा मांडला.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, युद्ध झाल्यास पूर्वी विदेशाकडे नजर असायची. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून देशाची ताकद दिसून आली.
देशात ११ वर्षात परिवर्तन घडले. २०१३ मध्ये जागतिक बँकेच्या अहवालानुसार देशातील गरिबांची संख्या २७ टक्के होती. ती आता पाच टक्क्यांवर आली आहे. गरिबांच्या कल्याणाची संकल्पना मोदींनी राबवली. नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला तीस लाख घरे दिले. त्यामुळे राज्यात एकही जण बेघर राहणार नाही.
राज्यात महायुतीला भक्कम यश मिळाले. पहिल्या १०० दिवसांचा कृती आराखडा राबवण्यात आला. त्यातून शासकीय कार्यालयात परिवर्तन दिसून आले. आगामी काळात सर्व शासकीय सेवा ऑनलाइन केल्या जाणार आहेत. ‘व्हॉट्स ॲप’शी करार झाला. डिसेंबरपर्यंत सर्व सेवा ‘व्हॉट्स ॲप’ येणार आहेत. त्यामुळे प्रशासन गतिमान व पारदर्शक होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी शिवणी विमानतळाचा प्रश्न मुख्यमंत्री सोडवतील, असा विश्वास खा. अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्र्यांकडे अकोल्याचे पालकत्व असून त्यांनी जिल्ह्याला भरभरून दिल्याचे आ. रणधीर सावरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. सभेचे सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. विजय अग्रवाल यांनी आभार मानले. विकास संवाद सभेसाठी मोठा जनसागर लोटला होता.
अकोल्यातून विमान उडेल – फडणवीस
अमरावती येथे दिलेला शब्द पूर्ण केला असून अमरावती मुंबई हवाई सेवा सुरू झाली. अकोल्यातील शिवनेरी विमानतळाच्या धावपट्टीचा देखील प्रश्न लवकरच सोडवण्यात येईल. त्यानंतर अकोल्यातून देखील विमान उडेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.