नागपूर : नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणून विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात. तरीही येथे बेशिस्तीने वाहन चालवणाऱ्यांची संख्या कमी नाही. गेल्या चार वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २३ हजारांवर नागरिकांचे वाहन चालवण्याचे परवाने आरटीओ कार्यालयाने निलंबित केले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात (नागपूर) गेल्या काही वर्षांत झपाट्याने रस्ते, उड्डाण पूल, मेट्रोसह इतरही विकासकामे झपाट्याने सुरू आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षितता समितीच्या माध्यमातून शहरातील ‘ब्लॅक स्पाॅट’ दुरुस्तीकडेही लक्ष घातले जात आहे. त्यानंतरही शहरातील अपघात व वाहतूक नियम मोडणाऱ्यांची संख्या जास्तच आहे.

हेही वाचा – २८ एचआयव्हीग्रस्त मातांकडून निरोगी व एचआयव्हीमुक्त बाळांना जन्म, चंद्रपूर शासकीय रुग्णालयात…

शहरात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या चार वर्षांत वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या २३ हजार ३३७ नागरिकांचे वाहन चालवण्याचे परवाने नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निलंबित केले. यापूर्वी वारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनधारकांचे परवाना निलंबनाचे प्रस्ताव फारसे आरटीओकडे पाठवले जात नव्हते. परंतु, हल्ली बेशिस्तीने वाहन चालवणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांसह आरटीओनेही कंबर कसली आहे. त्यानुसार तब्बल २३ हजार २२३ परवाने रद्द केल्याचे माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

हेही वाचा – ‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१,८२४ वाहन धारकांना आंतरराष्ट्रीय परवाने

नागपूर शहर आरटीओ कार्यालयाने १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या काळात १ हजार ८२४ वाहन चालकांना आंतरराष्ट्रीय वाहन चालवण्याचे परवाने दिले. तर या काळात नागपूर शहर हद्दीत १ लाख ७० हजार ९८ वाहनचालकांना शिकाऊ वाहन चालवण्याचे तर ७५ हजार १ वाहन चालकांना कायम वाहन चालवण्याचे परवानेही दिले गेल्याचे माहितीच्या अधिकारातून कोलारकर यांनी पुढे आणले.