अहंकार हा समाजाच्या प्रगतीत खोडा निर्माण करतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. माधव नेत्रालयाच्या प्रिमियम सेंटरचे वास्तू पूजन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वामी सवितानंद महाराज, सोलार इन्डस्ट्रीज लि.चे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, डॉ. निखिल मुंडले, डॉ. हर्षवर्धन मार्डीकर, मेजर जनरल (सेवानिवृत्त) अनिल बाम उपस्थित होते.

हेही वाचा >>> ऐकावं ते नवलंच! राष्ट्रीय महामार्ग बांधकामासाठी वापरणार राख

यावेळी भागवत पुढे म्हणाले, कोणतेही अस्तित्व हे एकाचे नसते. व्यक्ती आणि समूह एकत्र चालल्यानेच सृष्टी बनते. दोघांपैकी एकच चालल्यास व्यक्ती, समाज व सृष्टी सगळ्यांची हानी होते. मीच योग्य, इतर सगळे चुकीचे असे म्हणणे चुकीचे आहे. हा अहंकार आहे. या अहंकारानेच समाजाच्या प्रगतीत खोडा निर्माण होतो. विविध क्षेत्रातील लोक जे प्रामाणिकपणे काम करत आहेत, तोच धर्म आहे. आज विज्ञान थांबलेले का आहे, सर्व सुखसोयी असतानाही आम्ही दुखी का आहोत, याचे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही. आज ब्रँडचा काळ आहे. मात्र माझा अनुभव आहे की ज्या गोष्टीचा ब्रँड तयार होतो त्याचा दर्जा खालावतो. सेवा अनेक लोक करतात. मात्र सेवा व्रत चालवणे हे प्रत्येकाला शक्य नाही. असेच सेवा व्रत माधव नेत्रालय चालवत असल्याचेही भागवत यांनी सांगितले.

राज्यभरात मोतीबिंदू अभियान राबवणार- उपमुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्याकडे मोतीबिंदूची समस्या मोठी आहे. २०१६-१७ दरम्यान नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विकास महात्मे यांच्यासोबत एका प्रकल्पावर काम केले. त्यावेळी १४ लाख नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची तातडीने गरज असून न केल्यास अंधत्वाचा धोका असल्याचे पुढे आले. त्यानंतर शासकीय, धर्मादाय रुग्णालय, खासगी रुग्णालयाच्या मदतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबवले. परंतु गेली अडीच वर्षे या शस्त्रक्रिया ठप्प राहिल्याने पुन्हा मोतीबिंदूचे रुग्ण वाढले. त्यामुळे शासन सगळ्यांना सोबत घेऊन राज्यभरात मोतीबिंदू अभियान राबवणार आहे. विद्यार्थ्यांचीही तपासणी वेळोवेळी केली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.