महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर: राज्यात काही दिवसांपूर्वी विजेची मागणी तब्बल २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यामुळे एफ गटातील फिडरवर भारनियमन करण्याची पाळी महावितरणवर आली. परंतु एक- दोन दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाल्याने ही मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॅटवर आली आहे.

पावसाने दडी मारल्याने राज्यात गेल्या आठवड्यात विजेची मागणी थेट २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यापैकी २३ हजार ते २४ हजार मेगावॅटची मागणी महावितरणची होती. पावसाळ्यातील हा गेल्या काही वर्षांतील उच्चांक होता. महावितरणकडे मागणीच्या तुलनेत ९०० ते १,२०० मेगावॅट विजेचा तुटवडा असल्याने त्यांना एफ गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले.

आणखी वाचा-दिल्लीचे ठग वर्धा पोलीसांच्या जाळ्यात, असे करायचे फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु, आता राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे एकीकडे तापमानात घट तर दुसरीकडे कृषी पंपासह पंखे व इतरही विद्युत यंत्राचा वापर कमी झाल्याने मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॅटवर आली आहे. महानिर्मितीकडून ९ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजता ४ हजार ६६८ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. त्यापैकी ४ हजार ९ मेगावॅट औष्णिक, ४१ मेगावॅट सौर, १२६ गॅसपासून वीज निर्मिती केली जात होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८ हजार ४१२ मेगावॅट तर खासगी कंपन्यांपैकी अदानीकडून १ हजार ८२५, जिंदलकडून ९०८, रतन इंडियाकडून ८७६, एसडब्लूपीएलकडून ३७५ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. विजेची मागणी कमी झालेले भरनियमनाचे संकट तूर्तास दूर झाले आहे.