लोकसत्ता टीम

नागपूर : अंबाझरी तलावाच्या पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे आयटीपार्क ते लक्ष्मीनगर चौकापर्यंत वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. त्यात पुन्हा खाद्यपदार्थांच्या दुकानांमुळे या मार्गावरून सुरक्षित घरी पोहोचणे, हे मोठेच आव्हान ठरत आहे. विशेष म्हणजे, महापलिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, बजाजनगर, प्रतापनगर पोलीस आणि वाहतूक पोलिसांना हप्ते पोहचत असल्यामुळे यापैकी एकाही विभागाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर जवळपास शंभरावर खाद्यपदार्थांची दुकाने विनापरवानगी सुरू आहेत. पदपथावर खुर्च्या टाकून ग्राहकांना खाद्य पुरवले जात आहे. आधीच दुकानांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात पुन्हा ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत. तसेच स्वामी विवेकानंद चौकातून अंबाझरी टी-पॉईंट चौकापर्यंतचा रस्ता बंद असल्यामुळे वाहनांची वर्दळ माटे चौकातून जास्त आहे. त्यात पुन्हा रस्त्यावर खाद्यपदार्थांची दुकाने पदपथावरच थाटल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. ‘लोकसत्ता’ने याआधी या समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने कारवाईचा नुसताच देखावा केला. परंतु, या कारवाईनंतर दोन तासांतच महापालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून या रस्त्यावर पुन्हा दुकाने सुरू झाली.

आणखी वाचा-‘एमपीएससी’ पूर्व परीक्षेबाबत मोठी अपडेट… अखेर तारीख…

कारवाई दुपारी, अतिक्रमण रात्री

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या पदपथावरील खाद्यपदार्थांची दुकाने सायंकाळी लागतात. वाहतूक कोंडीसुद्धा सायंकाळीच होते. मात्र, महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक दुपारी या रस्त्यावर कारवाई करण्यासाठी चकरा मारतात. यावरून महापालिका या प्रकरणात बनवाबनवी करीत असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पदपथावर खाद्यपदार्थांची वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असेल तर वाहतूक पोलीस निश्चितच कारवाई करतील.” -कल्पना बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग.