लोकसत्ता टीम
नागपूर : पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीयांचा जीव गेला.हा भारतावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पहलगाम येथे सगळ्यात जास्त पर्यटक फिरायला जातात तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला, निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला. पीडित कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत. महाराष्ट्रातील सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीर इथे अडकले आहेत, यांना सुखरूपपणे घरी परतण्यासाठी सरकारने आवश्यक ती सगळी मदत करावी अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली.
या हल्ल्याचा तपास होईल ह्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी म्हणजे पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत दहशतवाद्यांना होणार नाही यासाठी आमचा पाठिंबा सरकारला कायम राहिल,असे वडेट्टीवार म्हणाले.
पण पहलगाम जिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात, तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणे ही सरकारची जबाबदारी होती. हा हल्ला झाला तेव्हा तिथे पोलीस, सैन्याची सुरक्षा व्यवस्था नव्हती हे दुर्दैवी आहे. हा हल्ला झाल्यानंतर तिथे सैन्य आणि पोलीस पोहोचले. याचे राजकारण करायचे नाही, पण हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. त्यामुळे हकनाक पर्यटकांचे जीव गेले, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
या हल्ल्यातील जी माहिती येते त्यावरून दोन धर्मात वाद निर्माण व्हावा, देशात वातावरण दूषित करण्याचा हेतू असू शकतो. यातून आपला देश अस्थिर करण्याचा कट असू शकतो त्यामुळे याप्रकरणी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई सरकारने करावी अशी मागणी विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पहलगाम पर्यटकांचे आकर्षण का?
पहलगाममध्ये जिथे हा हल्ला झाला त्या भागाला मिनी स्वित्झर्लंड असेही म्हटले जाते. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्हा आणि त्याचा पहलगाम परिसर अनेकदा दहशतवाद्यांच्या लक्ष्यावर असतो. परंतु, यापूर्वी बैसरन खोऱ्यात कधीही दहशतवादी हल्ला झाला नव्हता. या भागात स्थानिक लोकांनंतर पर्यटक सर्वात सुरक्षित मानले जात होते. यामुळे येथे लष्कर किंवा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले नव्हते. या परिस्थितीचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याचा कट पाकिस्तानातील रावळकोटमध्ये रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पहलगामला जाण्यासाठी पीर पंजाल टेकड्यांचा पर्याय निवडला.