नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून गडचिरोली, वर्धा, अमरावती जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती जिल्ह्याला मुसळधारेचा इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर जिल्ह्यात इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मूलचेरा-आष्टी, आलापल्ली-भामरागड आदी मार्ग बंद आहेत. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यातील पोथरा नदी पुलावरून पाणी वाहत असून सावंगी-हेटी, हिंगणघाट-पिंपळगाव आदी मार्ग बंद झाले आहेत. पहाटे काही घरात पाणी शिरले. अकोला जिल्ह्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झाला. नागपूर शहरात  कळमनासह काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अमरावती जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे  जनजीवन विस्कळीत झाले असून वरूड तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सातनूर, गव्हाणकूंड, बहादा, शेंदूरजनाघाट येथे पूरस्थिती आहे.  हजारो गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली. वरूड-अमरावती महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वरूड ते जरूड मार्गावर संपर्क तुटला. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील निर्माणाधिन पूलावरून पाणी वाहत असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood situation in many districts of vidarbha zws
First published on: 09-08-2022 at 02:52 IST