चंद्रपूर : महापालिकेने १ एप्रिल २०२५ पासून रूग्णवाहिका,शव वाहिका, पिण्याच्या व साध्या पाण्याचे टँकर या आवश्यक सेवांच्या दरात पाच टक्के इतकी मोठी दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य व गरीब नागरिकांना २०० रूपये भाड्यावरून थेट एक हजार रूपये भाडे द्यावे लागणार आहे. यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात संतप्त नागरिकांनी पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर ‘घे पैसा’ आंदोलनाच्या माध्यमातून नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त व त्यांचे शासकीय वाहन नसल्याने उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या.
जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी येथे आरोप केला आहे की मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना सर्वसामान्य गरीब जनतेशी काही देणे घेणे नाही. त्यामुळेच त्यांनी रूग्णवाहिका, शववाहिका तसेच इतर वाहनांच्या सुविाांमध्ये दरवाढ केलेली आहे. केवळ पैशाची भूक आहे हे दर्शविण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा ‘घे पैसा’ आंदोलन केले.
बुधवारी दुपारी गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर ‘घे पैसा’ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर महापालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असून आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली. शहराच्या हद्दीमध्ये यापूर्वी महापालिकेची रूग्णवाहिका सेवा निशुल्क होती.आता यासाठी ५०० रुपये भाडे आकारण्यात येत आहे. मनपा हद्दीच्या बाहेर रूग्णवाहिका व शव वाहिकेसाठी साठी २०० रुपये भाडे आकारण्यात येत होते. १ एप्रिल पासून मनपा यासाठी २०० ऐवजी १००० रुपये म्हणजेच पाचपट भाडे आकारण्यात येणार आहे. खासगी रूग्णवाहिका व शव वाहिका चालक १५ किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल- डिझेलचा खर्च घेतात.
महापालिका ॲम्बुलन्ससाठी १० किलोमीटर मागे एक लिटर पेट्रोल व शव वाहिकेसाठी ८ किलोमीटर मागे एक लिटर डिझेल घेत असल्याने इंधनाचा खर्चही जास्त लागणार आहे. याचा मोठा फटका शहरातील तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू लोकांना बसणार आहे.पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी देखील दरवाढ करण्यात आली आहे. शहरात लोकांच्या नळाला पिण्याचे पाणी येत नाही आणि महापालिका थेट टँकरसाठी भाडे वसूल करित आहे. नळाचे बिल द्या आणि भाडेही द्या ही सरळ सरळ वसूली आहे असाही आरोप देशमुख यांनी केला आहे. आयुक्त विपिन पालीवाल यांनी जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अनेक तक्रारी केल्या.कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. आमची लढाई ही शहरातील ४ लक्ष नागरिकांच्या हितासाठी आहे.
पैशाच्या हव्यासापोटी मनपाच्या तिजोरीची लूट करणाऱ्या कोणत्याही घोटाळेबाज अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही.आयुक्तांनी १०० तक्रारी केल्या व १०० गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. यासाठीच पुन्हा एकदा नोटांची उधळण केली. आयुक्तांनी १०० तक्रारी कराव्या. आम्ही एकच तक्रार करणार आणि आयुक्त पालीवाल सर्व घोटाळेबाजांसह जेलमध्ये जाणार हे त्यांनी लक्षात ठेवावे असाही इशारा दिला. तसेच जनविकास सेना दर आठवड्याला एक घोटाळा उघडकीस आणणार आहे. सोबतच एक लक्ष स्वाक्षऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करून पुराव्यासह सर्व घोटाळ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल.