नागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य स्तरावर कार्यरत असलेल्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा सायबर पोलिसांनी छडा लावला. या टोळीने इंदूरमध्ये बनावट कॉल सेंटर उभारून देशभरातील नागरिकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १४.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सुनील प्रतापसिंग राजपूत (२८) रा. छत्रीबाग, इंदूर, अभिषेक चंद्रकांत गुप्ता (३५) रा. नंदानगर, इंदूर आणि बंटी उर्फ विहान कमलचंद सोळंकी (३०) रा. उमरीखेडा, इंदूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई नागपूर सायबर पोलिसांनी राजेश सुकराम डोंगरे (५५) यांच्या तक्रारीवरून केली. त्यांनी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती.
५ मार्च २०२४ रोजी अभिषेक आणि रिया नावाच्या आरोपींनी राजेश यांच्याशी संपर्क साधला. ‘अल्गो ट्रेडिंग’च्या माध्यमातून मोठा नफा मिळेल, असे सांगत त्यांनी सुरुवातीला १ लाख रुपये गुंतवायला लावले. त्यानंतर ईमेलद्वारे सेबी (एसईबीआय)चे बनावट रजिस्ट्रेशन आणि अन्य कागदपत्रे पाठवली. १२ ट्रेडनंतर २५ टक्के कमिशन मिळेल, असे सांगत राजेशकडून विविध खात्यांमध्ये १२.४३ लाख रुपये वळते केले.
ईमेलच्या माध्यमातून त्यांना नफ्याची माहिती दिली जात होती. राजेश यांनी आपली गुंतवलेली रक्कम परत मागितली असता आरोपींनी एकूण रकमेवर ९.६३ टक्के जीएसटीचे ४.८३ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. राजेश यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार ही रक्कमही शुभम सेंगर नावाच्या व्यक्तीच्या खात्यात जमा केली. त्यानंतर वेगवेगळे कारण सांगून आरोपींनी राजेश यांच्याकडून ६३ लाख रुपये उकळले.
आरोपींची खाती गोठवली
सायबर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सर्वप्रथम आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली. आरोपींच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढला असता सर्व कॉल इंदूर येथून करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, सहायक पोलीस निरीक्षक कविकांत चौधरी, शैलेष, प्रफुल, योगेश आणि रोहित यांच्या पथकाने इंदूर येथील आरोपींच्या अड्ड्यावर धाड टाकली. तेथे लोकांची फसवणूक करण्यासाठी बनावट कॉल सेंटरच उभारण्यात आले होते. टेलिकॉलर म्हणून आरोपींनी २५ जणांना कामावर ठेवले होते. सुनील आणि अभिषेकला अटक करून नागपुरात आणल्यानंतर तिसरा आरोपी विहान बद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी त्यालाही अटक केली.
दोनशेवर लोकांची फसवणूक
आरोपींनी अशाप्रकारे २०० हून अधिक लोकांची फसवणूक केली आहे. केवळ नागपूरच नव्हे तर देशभरातील वेगवेगळ्या शहरातील लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्याकडून फसवणुकीची आणखीही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकासह १४.५५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.