गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुका, लगाम परिसरात ‘डेंग्यू’मुळे आठ दिवसात चार जणांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रादुर्भाव झाल्यानंतर स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला अंधारात ठेवल्याने उपायोजनेअभावी प्रादुर्भाव वाढला, असा आरोप गावाकऱ्यांनी केला असून बेजबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुलचेरा तालुक्यातील येल्ला व लगाम परिसरात डेंग्यूचा कहर सुरुच असून १३ ऑगस्टला आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आठ दिवसांत चार बळी गेल्याने आरोग्यसेवेचे धिंडवडे निघाले आहेत. येल्ला व लगाम येेथे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच डेंग्यू रुग्णसंख्या आढळून येण्यास सुरुवात झाली. ६ व ७ ऑगस्टला लागोपाठ दोघांचा मृत्यू झाला. मात्र, याचवेळी ७ ऑगस्ट रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांना जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यानंतर आणखी दोन बळी गेले, त्यामुळे या भागात मृत्यूसंख्या आता चार झाली आहे. सुधाकर पोच्चा कोकीरवार (४०,रा. येल्ला), किस्टा बाबुराव टेकुलवार (४० , रा.येल्ला), नैनतारा सुशील खराती (४५,रा. लगाम), नंदकिशोर विठ्ठलराव पोलशेट्टीवार (५७, रा. लगाम) यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.
एकीकडे डेंग्यूचे बळी जात असताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांना जिल्हा हिवताप अधिकारीपदाच्या अतिरिक्त कार्यभार देऊन बक्षीस दिले जात होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे. डॉ. मशाखेत्री यांचा अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सामान्य जनता वाऱ्यावर
‘डेंग्यू’ने दोन मृत्यू झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन खळबळून जागे झाले. पहिला रुग्ण आढळल्यानंतर लगेच जिल्हा मुख्यालयाला माहिती मिळाली असती तर तत्काळ उपाययोजनेने प्रादुर्भाव आटोक्यात आणता आला असता. त्यामुळे कदाचित काही लोकांचे प्राण देखील वाचले असते. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी तसे केले नाही. परिणामी ‘डेंग्यू’ची रुग्ण संख्या वाढून दररोज मृत्यू होत आहे. सध्या या परिसरात ९४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. येल्ला व लगाम या दोन गावांत सर्वाधिक रुग्ण असून काकरगट्टा , लगामचेक,गीताली,शांतिग्राम,टीकेपल्ली , कोलपल्ली येथेही रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची चमू याकडे लक्ष देऊन आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार भूमिकेवर रोष व्यक्त केला आहे.