भंडारा : ‘ड्रग्स-गांजाचे सेवन आणि विक्री करणारी भिक्षेकारांची टोळी शहरात सक्रिय’ या मथळ्याखाली दै. लोकसत्ताने दोन दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडाऱ्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांना कारवाईचे आदेश दिले. अखेर काल रात्री या भिक्षेकऱ्यांच्या टोळीची त्यांच्या जिल्ह्यात रवानगी करण्यात आली. तसेच परत न येण्याची सक्त ताकीद देण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यातील काचेवानी येथील फकीर टोळीचे हे भिकारी मागील अनेक महिन्यांपासून भंडारा येथे वास्तव्यास होते. भिक्षा मागण्याच्या नावाखाली ते लोकांना धमकावत असल्याची तसेच ड्रग्स गांजाचे सेवन आणि विक्री करीत असल्याची पुराव्यानिशी गोपनीय माहिती मिळताच लोकसत्ताने दि. ६ मार्च रोजी या संदर्भात वृत प्रकाशित केले होते.

हेही वाचा – नागपूरमध्ये गडकरींच्या दाव्याला भाजपाकडूनच खो!

या वृत्ताची गंभीर दखल घेत आणि कर्तव्यतत्परता दाखवत पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा पोलिसांना सत्यता पडताळून योग्य ते कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने ठाणेदार बारसे यांनी त्यांच्या चमूसह नगर पालिकेच्या क्रीडा मैदानावर तळ ठोकून बसलेल्या भिक्षेकऱ्याना त्यांच्या जिल्ह्यात परत जाण्यास सांगितले. तसेच स्वतः समक्ष त्यांची रवानगी करून मैदान रिकामे केले.

हेही वाचा – शालेय पुस्तकातील कोरी पृष्ठे ठरणार पाल्यांवर देखरेख ठेवण्याची संधी !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, तर लहान मुलांनी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच या भिक्षेकऱ्यांकडून गांजा आणि ड्रग्स घेऊन शहरात विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील केली जात आहे.