अकोला : इयत्ता दहावीच्या परीक्षा निकालात वाशीम जिल्हा अमरावती विभागात दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. वाशीम जिल्ह्याचा ९५.४१ टक्के निकाल लागला. या निकालातही मुलींचा दबदबा कायम आहे. ९७.१० टक्के मुली, तर ९४.०९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेसाठी वाशीम जिल्ह्यातून १९ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १९ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील १८ हजार ७९२ म्हणजेच ९५.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ११ हजार ०६६ मुले, तर आठ हजार ६२९ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील १० हजार ४१३ मुले आणि आठ हजार ३७९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.०९, तर ९७.१० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक ९६.७५ टक्के निकाल रिसोड तालुक्याचा लागला. वाशीम तालुक्याचा ९५.११, मालेगाव ९५.९८, कारंजा ९५.६५, मंगरुळपीर ९३.८९ व मानोरा ९४.६८ टक्के निकाल लागला आहे.

८७२२ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण

वाशीम जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत आठ हजार ७२२ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. सहा हजार ०९६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तीन हजार ३२८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ६४६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाशीम जिल्ह्यातील १०९ शाळांचा १०० टक्के निकाल

वाशीम जिल्ह्यातील एकूण माध्यमिक ३१७ शाळांपैकी तब्बल १०९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. ९०.०१ टक्के ते ९९.९९ टक्क्यांमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक १४५ शाळांचा समावेश आहे. ८०.०१ ते ९० टक्क्यांपर्यंत ४१, ७०.०१ ते ८० टक्क्यांपर्यंत १०, ६०.०१ ते ७० टक्क्यांपर्यंत सहा, ५०.०१ ते ६० टक्क्यांपर्यंत एक, ४०.०१ ते ५० टक्क्यांपर्यंत एक, १०.०१ ते २० टक्क्यांपर्यंत दोन शाळांचा निकाल लागला आहे. वाशीम जिल्ह्यातील एकाही शाळेचा शुन्य टक्के निकाल लागला नाही. अमरावती विभागात वाशीम जिल्ह्याचा निकाल उत्कृष्ट ठरला आहे. बारावीच्या निकालात वाशीम जिल्हा विभागात अव्वल स्थानी होता. दहावीच्या निकालात वाशीम जिल्हा दुसऱ्यास्थानावर राहिला. ०.११ टक्क्यांनी वाशीमपेक्षा बुलढाण्याचा निकाल जास्त लागला आहे.