गोंदिया: सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. यात आमगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याला अपयश आल्यामुळे त्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार ७ मे रोजी आमगाव शहरातील बजरंग चौक/दुर्गा चौक परिसरात घडली. कृष्णा धरम शिवनकर (१८) रा. आमगाव, जिल्हा गोंदिया असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. कृष्णा शिवणकर याने बारावी अनुत्तीर्ण झाल्यामुळे गळफास घेतला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मेला कृष्णाचा वाढदिवस होता. पण त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने हाच त्याचा मृत्यू दिवस ठरला. मुलाच्या निर्णयामुळे शिवणकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांकडून घटनेची माहिती आमगाव पोलिसांना देण्यात आली. आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून गळफास अवस्थेतील मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठवला. सदर घटनेचा पंचनामा करून पुढील तपास आमगाव पोलिसाकडून सुरू आहे.

गोंदिया जिल्ह्यातील एकूण १०६७ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते त्यापैकीच एक आमगावचा कृष्णा धरम शिवनकर (१८) हा होता. बारावीचा अपेक्षित निकाल न लागल्यामुळे कृष्णा सोमवार ५ मे निकालाच्या दिवसा पासूनच मानसिक तणावात होता. कृष्णाने बारावीच्या परीक्षेतील अपयश आल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती आमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली. तो निकालानंतर मानसिक तणावात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले, अशी माहिती पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांनी लोकसत्ता सोबत बोलताना दिली. या घटनेने आमगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेचे मानसिक ओझे किती जीवघेणे ठरू शकते, याचे हे अत्यंत वेदनादायक उदाहरण असल्याची प्रतिक्रिया सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी सावधानतेचा इशारा आहे. परीक्षांचा निकाल हा आयुष्याचा शेवट नाही, ही जाणीव पालक, शिक्षक आणि समाजाने विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवणे अत्यावश्यक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.