नागपूर: सरकारची आर्थिक स्थिती गंभीर आहे, कंत्राटदारांची देणी थकल्याने ते आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याही सुरूच आहे. कर्ज प्रचंड वाढले आहे, राज्य सरकार वेळीच सावरले नाही तर पुढच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनही विलंबाने होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवाार) ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ते नागपूरमध्ये वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.
जयतं पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या आधी तिजोरीत पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित केले. दिवसाला शंभर-शंभर निर्णय घेतले जात होते. सरकार गतिमान आहे, असे दर्शवले जात होते. आता त्याची गती काय आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले आहे.हा सगळा प्रकार महाराष्ट्राच्या फसवणुकीचा होता. एकाही खात्याला त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे मिळाले नाही. संजय गांधी निराधार योजना, आशा वर्कर असो, अंगणवाडी का असो, काही दिवसांनी सरकारी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होतील. आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली आहे, असे पाटील म्हणाले. सरकारची परिस्थिती गंभीर आहे. कर्ज प्रचंड झाले आहे. राज्यावर साडेनऊ लाख कोटीचा कर्ज झाले. सरकार १५, १६ लाख कोटीपर्यंत आम्ही कर्ज काढू शकतो. पण हे शहाणपणाचे लक्षण नाही, त्यामुळे यात सरकारने वेळीच भानावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे.याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कंत्राटदाराची आत्महत्या दुर्दैवी
शेतकरी आत्महत्या करत आहे.. कंत्राटदार आत्महत्या करत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात आम्ही कंत्राटदारांना सरकारी काम घेऊ नका, सांगत होतो. कंत्राटदारांनी स्वतःच्या खर्चातून कामे केली आहे. एकीकडे कर्जावर व्याज सुरू आहे आणि सरकार पैसे देत नाही. महाराष्ट्रात पाच लाख कंत्राटदाराची देयके थकित आहे. सरकारकडे ८९ हजार कोटी पेक्षा जास्त देणी थकित आहे. कंत्राटदारांना त्यांच्या देयकावर व्याजही सरकारने द्यायला हवे, असे जयंत पाटील म्हणाले.
कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा. विरोधक म्हणून आम्ही मागणी केली आहे. आपल सरकार कसा चालवायचं हे मुख्यमंत्री यांनी ठरवायचं आहे, खांदेपालट करणे म्हणजे कोकाटेंच्या वक्तव्याला मान्यता देणे होय. खांदेपालटाने स्वभाव बदलत नाही,असे पाटील म्हणाले.