लोकसत्ता टीम

वर्धा: येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात रामनवमी साजरी करण्यातून दोन गटात वाद उद्भवला. प्रत्युत्तर म्हणून आज, रविवारी सायंकाळी राम सन्मान यात्रा निघाल्याने विद्यापीठाच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे.

विद्यार्थ्यांच्या एका गटाने रामनवमीला परिसरात शोभायात्रा काढली. सामूहिक हनुमान चालिसा पठन कार्यक्रम झाला. अन्य कार्यक्रमही झाले. त्याचे पडसाद उमटले. दुसऱ्या गटाने यावर अश्लाघ्य शब्दात शेरेबाजी केली. मुलींच्या नृत्याला मुजरा म्हटले. त्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले. रामभक्त गटाने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत विद्यापीठ प्रशासनास निवेदन दिले. रामाचा अपमान खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा देत कठोर कारवाईची मागणी झाली. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटाने रामाचा अपमान केल्याचा आरोप रामभक्त गटाने केला आहे. आज, रविवारी राजगुरू वसतीगृहापासून राम सन्मान यात्रा काढून विरोध प्रदर्शीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव कादर नवाज यांची या संदर्भात प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भ्रामक अफवा पसरवू नका

विद्यापीठ प्रशासनाने सायंकाळी यासंदर्भात आवाहन करताना शांती कायम ठेवण्यासाठी विनंती केली आहे. भ्रामक अफवा पसरवू नका. विद्यापीठ या घटनेवर लक्ष ठेवून आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांना सूचित करण्यात आले असल्याचे जनसंपर्क अधिकारी मिरगे यांनी सांगितले.