बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेत काल रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे तीन नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. संग्रामपूर पट्ट्यात दोनेक तास झालेल्या कोसळधारने पदमावती, लेंडी व पांडव नदीला पुर आले. लाडणापुर पुलावरुन पाणी वाहत असल्याने रात्री वाहतूक बंद राहिली. टुनकी जामोद मार्ग बंद झाला.
पांडव नदिला पुर आल्याने लाडणापुर, टुनकी परिसरात घर, शेतीचे मोठे नुकसान झाले. लेंडी नदिला पुर आल्याने आलेवाडी गावात पाणी घुसले. पाच दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीची मदत तर सोडाच सानुग्रह अनुदान सुद्धा मिळाले नाही. त्यातच वरुण राजाच्या अवकृपे मुळे पिकांचे नुकसान झाले. पांडव नदिला पुर असल्याने लाडणापुर टुनकी येथील नागरिकांना सतर्क राहून रात्र जागुन काढावी लागली.