* सांडपाणी, पिण्याचे पाणी, स्वच्छता, अतिक्रमणासह अनेक प्रश्न जैसे थे

नागपूर : महापालिका बरखास्त झाली आणि एकूणच शहरातील नागरिकांशी संबंधित समस्यांचा गुंता उकलणे थांबले की काय अशी पऱिस्थिती गेल्या पाच महिन्यात निर्माण झाली आहे. प्रशासक नेमण्यापूर्वी किती नगरसेवक नागरी समस्यांची जाणीव असणारे होते हे सांगणे कठीणच. पण, किमान त्यांनी फोन केला तर अधिकारी, कर्मचारी समस्यांच्या सोडवणुकीसाठी समोर तरी यायचे. आता त्यांचे पद गेल्याने महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी नागरी समस्या सोडवण्यासाठी हात झटकतात.

हेही वाचा >>> बुलढाणा : शिक्षकी पेशाला काळिमा ; शिक्षिकेच्या नावे प्रेमकविता लिहिली अन्…

सुशिक्षित, मध्यम व उच्चमध्यमवर्गीयांच्या लोकवस्तींचा समावेश असलेल्या लक्ष्मीनगर झोनमधील समस्यांची जंत्री पाहिली तर अलीकडेच झालेल्या १८१ तक्रारींपैकी ५८ तक्रारी या सांडपाणी, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि पथदिव्यांशी संबंधित आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू असताना नागरी समस्यांचे प्रमाणही वाढतेच आहे आणि प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

हेही वाचा >>>अकरावीची विद्यार्थिनी चार महिन्यांची गर्भवती; प्रियकराचे नाव सांगण्यास नकार

वर्धा मार्गावरील ‘हॉटेल रेडिसन ब्ल्यू’ ते जयताळा परिसरातील अखेरचे टोक या संपूर्ण रस्त्यावर भाजी विक्रेते आणि मांस विक्रेत्यांनी दुकाने थाटली. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा केला जात आहे. ज्याठिकाणी रस्ते पूर्ण झाले तेथील जोडरस्ते अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथे पाणी साचते व त्यामुळे आणखी खड्डे पडतात. सोमलवार निकालस शाळेकडून खामला भाजीबाजारकडे येताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. थोडे दूर जात नाही तर याच मार्गावरून सहकारनगरात जाणारा रस्ता अर्धवट बांधकामामुळे बंद आहे. आनंद पूर्ती बाजारसमोरून सहकारनगरात जाण्यासाठी असलेल्या पर्यायी मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत. यास्थितीत नागरिकांनी कामासाठी घराबाहेर पडायचे तरी कसे, हा प्रश्न आहे.