अकोला : जिल्ह्याला २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. या तडाख्यात एक लाख ८८ हजार ४२४.८८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची प्रतीक्षा लागली असून त्यासाठी २०७ कोटी ९२ लाख ६४ हजार ८१० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. तो निधी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदतीचे वितरण केले जाणार आहे.

अवकाळी पावसामुळे खरीपसह रब्बी हंगामातील पिकांचेही नुकसान झाले. कापूस, तूर, हरभरा, भाजीपाला, फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून महसूल, कृषी, ग्राम विकास (जिल्हा परिषद) विभागाकडून मदत निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने बाधित खातेदारांची संख्या २ लाख ४४ हजार ६९ आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कपाशी आणि तूर पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ५२६.६६ हेक्टरवरील जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात ७२९ गावांतील एक लाख ६८ हजार ३५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मदतीसाठी ११६ कोटी ४७ लाख ६ हजार ६१० रुपयांच्या मदत लागणार आहे.

हेही वाचा : नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनातून काय साध्य झाले ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फळ पिके वगळता ४५ हजार २५८.५ हेक्टरवरील बागायती पिकांची हानी झाली. त्यासाठी ७६ कोटी ९३ लाख ९४ हजार ५०० रुपयांच्या मदतीची आवश्यकता आहे. पावसामुळे ७४९ गावातील ६६ हजार ३६१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. फळपीकाखालील ६ हजार ६३९.७२ हेक्टरवरील बाधित झाले. त्यात २६३ गावांतील नऊ हजार ६७३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मदतीसाठी १४ कोटी ९३ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा निधी मागण्यात आला आहे.