अमरावती : शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरूकुंज मोझरी येथे गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या सातव्या दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यानंतर कडू यांनी अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित करण्याची घोषणा केली. त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांचे आभार मानले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी, दिव्यांग आणि मजुरांच्या मागण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेले आंदोलन बच्चू कडू यांनी आज मागे घेतले. मी जिल्ह्याचा पालकमंत्री व महसूलमंत्री म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बच्चूभाऊ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सरकार त्यांच्या मागण्यांवर नक्की विचार करणार आहे. कारण, हे सरकार लोकांचे आहे. आणि, लोककल्याणाचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देणारे आहे. मी आंदोलनस्थळी गुरुकुंज मोझरीला बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यांनी सविस्तर चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन बच्चू कडू यांना दिले होते.”
बावनकुळे म्हणाले, “मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे व्यथा मलाही कळतात. अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सर्व घटनाक्रमाकडे लक्ष ठेवून होतो. प्रशासन आणि बच्चू कडू यांच्याशी सतत संपर्कात होतो. काल बच्चू कडू यांच्याशी माझी भेट झाल्यावर सकारात्मक चर्चा झाली. पावसाचे दिवस, पेरण्या आणि शेतीची कामे यामुळे सकारात्मक निर्णय घ्या, अशी विनंती मी त्यांना केली होती. त्यावेळीच त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून आंदोलन मागे घेईन, असे सांगितले होते.
पुन्हा, आज मंत्री मंडळातील सहकारी उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी त्यांच्याशी चर्चा केली. सरकारची भूमिका त्यांना सांगून आंदोलनकर्त्यांसमोर राज्य सरकारचे पत्र वाचून दाखविले. त्यांनी केलेल्या मागण्यांवर येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात लवकरच उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. दिव्यांग बांधवांच्या अनुदान वाढीसंदर्भात विधिमंडळाच्या येणाऱ्या अधिवेशनात आर्थिक तरतूद वाढवून देऊ, असे त्यांना सांगितले. देशात शेतकरी, महिला, गरीब, युवा या चारच जाती आहेत. महायुती सरकारचीही लोककल्याणाची हीच भूमिका आहे,” असे बावनकुळे यांनी सांगितले.