अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ढाकुलगाव येथील शेतकरी मारुती रामचंद्र डवरे (७५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांचा मृतदेह घराजवळच एका झाडाखाली आढळून आला. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा कयास व्यक्त केला जात आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर ही घटना घडली आहे.

मारुती डवरे यांच्याकडे तीन एकर शेती असून सततची नापिकी, कर्जाचा बोजा हा दरवर्षी वाढत चालत असल्याने नेहमी चिंतेत राहायचे. दुसरीकडे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत ते सापडले होते. राहत्या घराजवळ त्यांनी पहाटे च्या सुमारास गळफस घेऊन जीवनायात्रा संपवली. स्टेट बँक शाखा अंजनसिंगी चे एक लाख रुपये कर्ज होते. ते थकीत होते. त्यांच्या मागे एक पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

गेल्या चार महिन्यात जिल्ह्यात ६१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. गत वर्षात काही ठिकाणी पडलेला पावसाचा खंड, काही भागात झालेली अतिवृष्टी यामुळे पिकांचे उत्पादन कमी झाले. आता त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. गेल्या महिन्यात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप केला जात आहे.

कर्ज काढून पेरणी करणे, पीक वाचविण्यासाठी अथक मेहनत करूनही कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही यामुळे शेतकरी कमालीचे अडचणीत आले. या चक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता नेहमीच असते. त्यामुळे या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात चार महिन्यात ६१ शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यापैकी निकषानुसार ९ आत्महत्या ह्या पात्र ठरल्या आहेत. तसेच ४ अपात्र तर ४८ प्रकरणे हे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तसेच ४ शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यात आल्याचा दावाही शासनाने केला आहे. ५ प्रकरणातील कुटुंबांना अद्यापही मदत मिळणे बाकी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या; तर यंदा सुरुवातीच्या चार महिन्यातच ६१ शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी मागील महिन्यात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला.