अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या हिश्शापोटीचा निधी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देता येत नसल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अमरावती विभागात ‘एनएचएम’अंतर्गत विविध पदांवर हजारो कर्मचारी काम करत आहेत. त्यांना राज्य सरकारमार्फत मानधन दिले जाते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून हे मानधन मिळालेले नाही. आरोग्य विभागात दोन सचिव, आरोग्य आयुक्त तसेच अनेक कर्मचारी असूनही केंद्राकडून जो निधी मिळणे अपेक्षित आहे तो वेळेवर का मिळत नाही, असा सवाल करण्यात येत आहे.

वेतनातही तफावत

जिल्हा परिषद असो वा महानगरपालिकेचा आरोग्य विभाग यामध्ये कायमस्वरुपी सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी ज्या सेवा देतात त्याच सेवा राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारीही देतात; मात्र, दोघांच्या वेतनात दुप्पट-तिपटीने तफावत असल्याचे समोर आले आहे.

केंद्राच्या ६० टक्के, तर त्या त्या राज्य सरकारच्या ४० टक्के निधीतून सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनासह विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. आरोग्य विभागात कायमस्वरुपी सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व इतर कर्मचारी ज्या सेवा देतात त्याच सेवा ‘एनएचएम’चे कर्मचारीही देतात; मात्र दोघांच्या वेतनात दुपटी-तिपटीने तफावत आहे. कायमसेवेतील डॉक्टरला एक-सव्वा लाख रुपयांपर्यंतचे वेतन आहे, तर ‘एनएचएम’ च्या डॉक्टरला ३५ ते ४० हजार रुपयांचे वेतन आहे. कायम सेवेतील परिचारिकेला ७० ते ८० हजार रुपये वेतन मिळते तर ‘एनएचएम’च्या परिचारिकेता २२ ते २५ हजार रुपये मिळतात अशीच तफावत इतर सर्व पदांमध्ये आहे. तेच काम असूनही वर्षानुवर्षे दुपटी-तिपटीने कमी वेतन मिळत असल्याची खंत एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर अडचणी येत नाहीत, असे वारंवार महायुतीच्या नेत्यांनी सांगितले. आरोग्य विभागाला मात्र उलट अनुभवाचा सामना करावा लागत आहे.

निधी मिळालेला नाही

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही, हे खरे आहे. शासनाकडून निधी न मिळाल्याने त्यांना अद्याप वेतन देता आलेले नाही. – डॉ. कमलेश भंडारी, आरोग्य उपसंचालक.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत मेळघाटात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. मेळघाटात ७० सीएचओ, २२ एचएमओ, ८५ एएनएम, ९० डाटा एन्ट्री ऑपरेटर असे सुमारे १ हजार ५० कर्मचारी कार्यरत आहेत. विपरित परिस्थितीत वेतनाविना ते काम करीत आहेत. दुर्गम भागात काम करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या कर्मचाऱ्यांना ‘हार्डशीप अलाऊन्स’ दिला जातो, तोही वर्षभरापासून मिळालेला नाही. – ॲड बंड्या साने, ‘खोज’ संस्था.