बुलढाणा : संग्रामपूर येथील एटीएम चोरी प्रकरणी काही तासांतच दोन आरोपींना एटीएम व त्या वाहनासह पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक जालनाकडे रवाना झाले आहे. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांनी’लोकसत्ता’ सोबत बोलताना ही महत्वपूर्ण माहिती दिली. जालना पोलिसांनी दोघा आरोपींना एटीएम व मालवाहू वाहनासह पकडले. त्याची माहिती मिळताच जालना येथे विशेष पथक रवाना करण्यात आले. पथकात पोलीसांसह स्टेट बँकेचे संग्रामपूर शाखा व्यवस्थापक, एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

हेही वाचा : चोरट्यांनी चक्क ‘एटीएम’च नेले उचलून, लाखोंची रक्कम लंपास; संग्रामपूर येथील घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेतील तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या दोघा साथीदारांकडून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहितीही ठाणेदार उलेमाले यांनी दिली. आज पहाटे पोलिसांच्या गस्तीमध्ये संग्रामपूर येथील स्टेट बँकेचे एटीएम त्यातील रक्कमेसह चोरीस गेल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच ठाणेदार यांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. तसेच जालना, अकोला, जळगाव आदी सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली. यामुळे आरोपींना लवकर पकडण्यात यश आले. ही घटना तपासाच्या दृष्टीने आव्हानात्मक होती. त्यातच केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आज संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे संकल्प यात्रेवर आहेत. त्यामुळे पोलीस दुहेरी दडपणात होते. मात्र दोन आरोपी, एटीएम व वाहन सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.