चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक एकेक करून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपावासी होत असल्याने काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदार संघात वडेट्टीवार समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे हे राजकीय नाट्य सुरू आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. भाजपा व काँग्रेस उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, विजय वडेट्टीवार समर्थक एकेक करून काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करीत आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीचे काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते व त्यांची पत्नी डॉ. चंदा कोडवते यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत तिकीट विकल्या जातात, असा गंभीर आरोप करून भाजपामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, याच काँग्रेस पक्षाकडून डॉ. उसेंडी एक वेळा आमदार राहिले असून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविली आहे. या तिन्ही वडेट्टीवार समर्थकांनी राजीनामा दिला.

हेही वाचा : बुलढाण्यात तिरंगी लढतीची चिन्हे! युती-आघाडीसमोर नाराजीची आव्हाने; अपक्षांच्या ‘एन्ट्री’मुळे लढत रंजक

चौथा भाजपा प्रवेश हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा होता. देवतळे यांचा प्रवेश विजय वडेट्टीवार व काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी अतिशय धक्कादायक मानला जात आहे. विजय वडेट्टीवार यांच्या आशीर्वादामुळे देवतळेंसारखा अकार्यक्षम व्यक्ती सलग नऊ वर्षे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचा अध्यक्ष होता. विजय वडेट्टीवार यांनी उठ म्हटले तर उठणारा व बस म्हटले तर बसणारा देवतळे यांच्यासारखा जिल्हाध्यक्ष गेल्या नऊ वर्षात जिल्हा परिषद, महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेची एकही निवडणूक आजवर लढला नाही. विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार व देवतळे यांच्या नात्यात इतकी घनिष्ठता होती की सार्वजनिक ठिकाणी विजय वडेट्टीवार ‘प्रकाशराव’ इतक्या आदराने देवतळे यांना आवाज द्यायचे. असे असतानाही देवतळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, स्वतःच्या गाडीचा चालक, कार्यालयातील संगणक चालक, झाडू मारणारा आणि चहावाला, या चार रोजंदारी कार्यकर्त्यांशिवाय पाचवा कार्यकर्ता देवतळे यांच्या सोबत नाही. त्यामुळे देवतळे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हाच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी भाजपा, संघाच्या व्यक्तींच्या हाती काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सोपवल्याचा आरोप केला होता. आता देवतळे यांच्या भाजपा प्रवेशाने पुगलिया यांचा आरोप खरा होता, हे म्हणण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा : धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

वडेट्टीवार यांचे समर्थक भाजपामध्ये का जात आहेत, याचा राजकीय दृष्टीकोनातून विचार केला तर चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदार संघांपैकी एकही जागा वडेट्टीवार समर्थकाला मिळाली नाही. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेची जागा स्वतःची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचेसाठी मागितली होती. तर गडचिरोली लोकसभा सलग दोन लोकसभा निवडणुकीत एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने व विधानसभा निवडणुकीतदेखील पराभूत झालेल्या डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासाठी मागितली होती. मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी चंद्रपूर येथे वडेट्टीवार विरोधी आमदार प्रतिभा धानोरकर तथा गडचिरोलीत डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली. हा वडेट्टीवार यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता.

हेही वाचा : नागपुरात काँग्रेसचा दुसरा गट पक्षाचे काम करणार का?

लोकसभेच्या दोन्ही जागा न मिळाल्याने वडेट्टीवार कमालीचे असस्थ झाले आहेत. याच अस्वस्थतेतून वडेट्टीवार समर्थक एकेक करून भाजपामध्ये प्रवेश करत आहे आणि काँग्रेस नेत्यांना एक प्रकारे संदेश देत आहेत, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, वडेट्टीवार गडचिरोली येथे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेले होते. मात्र, चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या, पती दिवं. बाळू धानोरकर यांच्या मृत्यूला काँग्रेसमधील कलह कारणीभूत आहे, या आरोपामुळे विजय वडेट्टीवार नाराज आहेत. त्यामुळे वडेट्टीवार चंद्रपूरपासून अंतर ठेवून आहेत.